शिंदेंवर केलेल्या आरोपावर फडणवीसांचे राऊतांना जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले, केवळ सनसनाटी...
सध्या राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहे. त्यातच दुसरीकडे नुकताच निवडणूक आयोगाने शिंदे गटाला शिवसेना पक्षनाव आणि चिन्ह दिल्यामुळे राज्याच्या राजकारण चांगलेच तापले आहे. या निर्णयामुळे शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यातील वाद आणखीच उफाळून बाहेर आला आहे. या वादादरम्यान आज ठाकरे गट नेते संजय राऊत यांनी शिंदे गटावर खळबळजनक आरोप केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी मला जीवे मारण्यासाठी सुपारी दिल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे. यासंबंधी त्यांनी मुंबई पोलिस आयुक्तांना आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पत्र लिहले आहे. त्यावरच आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले राऊतांच्या आरोपावर देवेंद्र फडणवीस?
संजय राऊत यांच्या पत्रावर माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, नक्की हे पत्र सुरक्षा मागण्यासाठी आहे की केवळ सनसनाटी निर्माण करण्या करता आहे. हा माझा सवाल आहे. सुरक्षेचे विषय राजकारणाशी जोडणे अतिशय चुकीचे आहे, कोणत्याही पुराव्याशिवाय असे आरोप करणे हे त्याही पेक्षा चुकीचे आहे. संजय राऊत असो की कोणीही असो, असुरक्षित वाटत असेल तर ती असुरक्षितता आहे का, त्यांना काही सुरक्षा देण्याची गरज आहे का? ही सर्व कार्यवाही इंटेलिजन्स डिपार्टमेंट करत असते. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे काम करत नाहीत, परंतु, हे पत्र विभागाकडे जाईल आणि त्यांना सुरक्षा दिली जाईल.असे त्यांनी यावेळी माध्यमाना सांगितले.
पुढे ते म्हणाले की, त्यांना अलीकडच्या काळात प्रसिद्धीची सवय लागली आहे. विनाकारण रोज कोणतातरी आरोप करायचा, कधी दोन हजार कोटींचा आरोप, कधी हल्ल्याचा आरोप, पण एकही पुरावा त्यांच्याकडे नाही. पूर्वी त्यांच्या आरोपांना आम्ही उत्तर तरी द्यायचो, पण आता इतके बिनडोक आरोप ते करतात, की त्याला काय उत्तर द्यायचे हा प्रश्न पडतो. असा टोला त्यांनी लगावला. त्यामुळे ही जी सनसनाटी ते निर्माण करतायत, याने काहीही फायदा होणार नाही. त्यांना सहानभूती मिळेल असे वाटतेय, तर त्यांना ती मिळणार नाही. रोज खोटे बोलल्याने सहानभूती मिळत नाही. लोकांना हे सर्व लक्षात येते, असे जोरदार प्रत्युत्तर फडणवीसांनी राऊतांना दिले.