कुणाची सुपारी घेऊन बारसू रिफायनरीला...; फडणवीसांचा मविआवर निशाणा
मुंबई : कोकणातल्या रिफायनरीच्या सर्वेक्षणाविरोधातील आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे. आज सकाळी पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेतल्याचंही सांगितलं जात आहे. मात्र, प्रकल्प हद्दपार होत नाही तोपर्यंत माघार घेणार नसल्याची भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. यावर राज्यातील राजकारण तापले असून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेची तोफ डागली आहे. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
देशाच्या इतिहासतली ही सर्वात मोठी गुंतवणूक करत आहेत. या गुंतवणुकीमुळे कोकणात एक लाख लोकांना रोजगार मिळणार आहे. याआधी नाणारला रिफायनरी करायचं ठरवलं तेव्हा उद्धव ठाकरेंनी विरोध केला. त्यानंतर त्यांच्याही हे लक्षात आलं. त्यामुळे बारसूला रिफायनरी करा, असे पत्र उद्धव ठाकरेंनी पाठवले होते. आता पुन्हा तेच विरोध करत आहेत, असे फडणवीसांनी म्हंटले आहे.
आम्ही चर्चा करायला तयार आहे. भूमिपुत्रांवर कुठलाही अन्याय होणार नाही हा प्रयत्न करु. पण, त्याचवेळी राजकारणापुरतं जे विरोध करत आहेत त्यांचा विरोध सहन करणार नाही. जामनगरला रिलायन्सची रिफायनरी आहे. परंतु, तिथे कुठेही पर्यावरणावर परिणाम झालेला नाही. तसाच तो आपल्याकडेही होणार नाही. आपल्याकडील ग्रीन रिफायनरी आहे, असे म्हणत जे लोक विरोध करत आहेत त्यांना मला विचारायचं आहे की नेमकी कुणाची सुपारी घेऊन हा विरोध तुम्ही करत आहेत. बरं प्रकल्प बाहेर गेला की बोंब मारायची आणि प्रकल्प येत असेल तर विरोध करायचा, असा निशाणाही फडणवीसांनी विरोधकांवर साधला आहे.
दरम्यान, उदय सामंत यांनीही पत्रकार परिषद घेत भूमिका मांडली आहे. शेतकऱ्यांचे सर्व गैरसमज दूर केले जातील. मला कुठल्याही पक्षाच्या नेत्यांना उत्तर द्यायचं नाही. अनावधानाने प्रशासनाकडून माध्यमांशी गैरवर्तन झाले असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो. वाईट घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. समृद्धी महामार्गाच्या वेळी जसा न्याय दिला तसा न्याय शेतकऱ्यांना दिला जाईल, असेही त्यांनी सांगितले.