शरद पवारांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर राष्ट्रवादीतील गोंधळावर फडणवीसांची प्रतिक्रिया; हे सगळं स्क्रिप्टेड...
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वासर्वे शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा केल्यानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ माजली आहे. शरद पवारांच्या या घोषणेनंतर राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्क लावण्यात येत आहेत. या सर्व गोंधळा दरम्यान आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सर्व घडामोडींवर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर चांगलाच निशाणा साधला. जोपर्यंत सिनेमाचा एन्ड होत नाही तोपर्यंत आम्ही काय प्रतिक्रिया द्यायची? अशी टीका फडणवीसांना यावेळी दिली.
नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
शरद पवारांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर राज्याच्या राजकारणात एकच गदारोळ सुरू आहे. या सर्व घटनेवर आज फडणवीसांना माध्यम प्रतिनिधींकडून विचारण्यात आले असता त्यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हा अंतर्गत चित्रपट आहे. कलाकार देखील अंतर्गत आहे, पटकथा देखील अंतर्गत आहे. त्यामुळे जोपर्यंत सिनेमाचा एन्ड होत नाही तोपर्यंत आम्ही काय प्रतिक्रिया द्यायची? पटकथेचा जेव्हा शेवट समजेल तेव्हा यावर प्रतिक्रिया देऊ, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. हे सगळं स्क्रिप्टेड होतं, असं मी म्हटलं नाही. जेव्हा या चित्रपटाचा शेवट होईल, असा टोला त्यांनी यावेळी लगावला.
पुढे बोलताना बारसू प्रकल्पावर बोलताना त्यांनी शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यावर देखील निशाणा साधला. ते म्हणाले की, उद्धव ठाकरे यांची दुटप्पी भूमिका आहे. स्वतःच बारसूला प्रकल्प व्हावा असं पत्र लिहायचं आणि स्वतः तिथं जाऊन लोकांना चिथावणीखोर वक्तव्य करायची. उद्धव ठाकरे यांचा विकासविरोधी चेहरा समोर आला आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. उद्धव ठाकरे यांना समाजाशी, विकासाशी काहीही देणं-घेणं नाही. निव्वळ राजकारण करायचं त्यासाठी दुसऱ्यांचे खांदे वापरायचे. आता त्यांना बारसूच्या लोकांचा खांदा मिळाला आहे, अशी टीका त्यांनी ठाकरेंवर केली.