Devendra Fadnavis : बंडखोर आमदार ईडीमुळेच फुटले, पण...
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नव्या सरकारची आज बहुमत चाचणी झाली. बहुमत चाचणीत शिंदे सरकारने बहुमताचा आकडा पार करुन 164 मतांनी विजयावर शिक्कामोर्तब केले आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे सरकारचा अभिनंदन प्रस्ताव मांडला. यावेळी फडणवीसांनी एकनाथ शिंदे यांचे तोंडभरुन कौतुक केले.
एकनाथ शिंदे हे चांगले मुख्यमंत्री बनतील, असा विश्वास व्यक्त करत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शिंदे हे प्रचंड सामान्य जनतेसाठी जीवाची परवा न करता काम करणारे नेता आहेत. परिस्थिती नसल्यामुळे शिंदे यांना शिक्षण घेता आले नाही. परंतु, त्यांनी हार न मानता वयाच्या 56 व्या वर्षी त्यांनी पदवीचे शिक्षण पूर्ण केले. २००४ पासून सलग चार वेळा एकनाथ शिंदे महाराष्ट्राच्या विधानसभेत पोहोचले. मागच्या काळात मंत्री म्हणून त्यांनी काम केलं. सीमाप्रश्नाच्या आंदोलनाप्रसंगी ४० दिवस बेल्लारीच्या तुरुंगात कारावास भोगला व त्यातून मोठं व्यक्तिमत्व तयार झाले. आजही एकनाथ शिंदे ४०० ते ५०० लोकांना भेटतात. मी एकनाथ शिंदेंना सांगितले की मुख्यमंत्र्यानी थोडी वेळ पाळली पाहिजे. याची त्यांनी सुरुवातही केली आहे, असे त्यांनी सांगितले.
मतदानाच्यावेळी बंडखोर आमदार उभे राहताच विरोधकांनी ईडीच्या घोषणा दिल्या. याला प्रत्युत्तर देताना फडणवीस म्हणाले, हे खरय की ही लोक ईडीमुळेच इकडे आली. पण, ईडी म्हणजे एकनाथ आणि देवेंद्र, असे त्यांनी म्हंटले आहे.
या सभागृहाने शिवसेना भाजपा युतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर प्रचंड विश्वास दाखवला. त्यामुळे त्यांचे अभिनंदन करतो. ज्या सदस्यांनी शिवसेना-भाजप युतीच्या बाजूने मतदान केले त्यांचे आभार मानतो. पण, ज्या सदस्यांनी अप्रत्यक्षपणे प्रचंड मताने युती विजयी व्हावी यासाठी बाहेर राहून मदत केली त्या अदृश्य हातांचेही मी आभार मानतो, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटले होते.