...आक्षेपार्ह विधान केलेले नाही, शिंदे गटातील 'या' नेत्याने केले लाड यांच्या वक्तव्याचे समर्थन
राज्यात मागील काही दिवसांपासून एकच राजकीय गोंधळ सुरु आहे. तर दुसरीकडे सतत राजकीय मंडळींकडून वादग्रस्त विधानाचे सत्र सुरु आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाचे पडसाद कायम असताना भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी देखील वादग्रस्त विधान केले त्यामुळे ते वादात सापडले आहेत. त्यावर विविध स्तरातून प्रतिक्रिया उमटत असतानाच आता शिंदे गटातील बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी प्रसाद लाड यांचे समर्थन करणारे वक्तव्य केले आहे.
काय म्हणाले खासदार जाधव?
प्रसाद लाड यांचे समर्थन करताना बोलताना खासदार प्रतापराव जाधव म्हणाले की, प्रसाद लाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान केलेले नाही, ज्यांना असे वाटत असेल त्यांनाच इतिहास माहीत नसावा, असे समर्थन करणारे वक्तव्य बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव केले आहे. प्रसाद लाड यांनी चुकीने ते वाक्य म्हटले. त्यांच्या वाक्याची इतिहासात नोंद थोडीच होणार आहे, असेही खासदार जाधव यावेळी म्हणाले आहेत.
काय म्हणाले होते प्रसाद लाड?
स्वराज्यभूमी कोकण महोत्सव कशासाठी तुम्ही विचारा तर हिंदवी स्वराज्याची जी स्थापना झाली ती केली. आणि संपूर्ण आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराजांचा हा कोकणात झाला. त्यानंतर रायगडावर त्यांचे बालपण गेले आणि रायगडावरती त्यांनी स्वराज्याची स्थापना केली. यामुळे ती सुरुवात कोकणात झाली, असे विधान त्यांनी केले आहे. यादरम्यान, उपस्थितांनी प्रसाद लाड यांना शिवरायांचा जन्म शिवनेरीवर झाल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु, आपले विधान दुरुस्त न करता त्यांनी पुढील विधाने सुरु ठेवली.