पंतप्रधानांच्या दौऱ्यावर केलेल्या टीकेला फडणवीसांचे जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले, इकडे येताना...
राज्यात सध्या प्रचंड राजकीय गोंधळ सुरु आहे. त्यातच नुकताच काल म्हणजेच 10 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर येऊन गेले. 22 दिवसाच्या आत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा दुसऱ्यांदा मुंबई दौरा होता. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे दौरे होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. त्यांच्या या दौऱ्यावर अनेक राजकीय मंडळींनी टीका केली. आता याच टीकेवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यावर झालेल्या टीकेला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जे आपल्या हयातीत काहीच करू शकले नाहीत, तेच लोक दुसऱ्यांवर टीका करतात. नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येत असतील, तर येथील लोकांनी आनंद साजरा केला पाहिजे. कारण ते इकडे येताना, नेहमी काही ना काही घेऊन येतात. असे जोरदार प्रत्युत्तर त्यांनी दिले.
पुढे ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं एकच मिशन आहे, ते म्हणजे ‘मिशन इंडिया' मिशन इंडियासाठी ते देशभरात फिरत असतात. ते मुंबईत दुसऱ्यांदा आले असतील, तर त्याचा आनंद साजरा केला पाहिजे. कारण ते येताना काहीतरी घेऊन येतात. आता पहिल्यांदाच एका राज्यात धावणाऱ्या दोन ‘वंदे भारत’ गाड्या महाराष्ट्राला मिळाल्या आहेत. हा मान पहिल्यांदा महाराष्ट्राला मिळाला.” असे ते यावेळी माध्यमांशी बोलताना म्हणाले.