राज्यपालांचे वादग्रस्त वक्तव्य; अजित पवारांची प्रतिक्रिया, वेळ आलीयं पंतप्रधानांनी गंभीर...

राज्यपालांचे वादग्रस्त वक्तव्य; अजित पवारांची प्रतिक्रिया, वेळ आलीयं पंतप्रधानांनी गंभीर...

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने राज्यात नवा वाद निर्माण झाला आहे.

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने राज्यात नवा वाद निर्माण झाला आहे. यावरुन विरोधकांनी राज्यापालांवर टीकास्त्र सोडले आहे. राज्यपालांच्या वक्तव्यांच्या निषेधार्थ राज्यभरात आंदोलने करण्यात येत आहेत. अशातच विरोधी पक्षनेते अजित पवार यांची महत्वपूर्ण प्रतिक्रिया दिली आहे.

अजित पवार म्हणाले की, महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज जगातील सर्वकालिन, सर्वश्रेष्ठ आदर्श राजे आहेत. राजसत्तेचा उपयोग विलासासाठी नव्हे तर लोककल्याणासाठी कसा करता येतो, याचा आदर्श त्यांनी निर्माण केला. छत्रपती शिवरायांना आदर्श मानून महाराष्ट्र आजवर घडला, यापुढेही घडत राहील.

महाराष्ट्राच्या राज्यपालपदी तीन वर्षांहून अधिक काळ राहूनही राज्यपाल महोदयांना छत्रपती शिवाजी महाराज समजत नसतील, महाराष्ट्र व महाराष्ट्राची लोकभावना कळत नसेल, तर राज्यपाल महोदयांनी पदावर राहण्याबाबत गांभीर्यानं पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे. राज्यपाल महोदयांच्या अनावश्यक, अनाकलनीय, निंदनीय वक्तव्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गांभीर्यानं दखल घेण्याची वेळ आली आहे. राज्यपाल महोदयांना सद्‌बुद्धी लाभो, ही प्रार्थना, असा टोला अजित पवार यांनी राज्यापालांना लगावला आहे.

काय म्हणाले होते राज्यपाल?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पदवीदान समारंभात राज्यपाल भगत सिंह कोश्यारी बोलत होते. यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि भाजप नेते नितीन गडकरी यांनी डीलिट पदवी देऊन गौरवण्यात आलं. यावेळी भाषण करताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नितीन गडकरी यांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी केली.

आम्ही जेव्हा शाळेत शिकत होतो. तेव्हा आम्हाला आमचे शिक्षक विचारायचे तुमचा आवडता नेता कोण आहे? महाराष्ट्रातच तुम्हाला भेटून जातील. शिवाजी महाराज तर जुन्या काळातील आहेत. मी आधुनिक काळाबाबत बोलत आहे. इथेच मिळतील. डॉ. आंबेडकरांपासून ते डॉ. नितीन गडकरींपर्यंत तुम्हाला सर्व इथेच मिळून जातील, असं वादग्रस्त विधान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com