सत्तारांच्या राजीनाम्यावर पाटलांचे विरोधकांना उत्तर; म्हणाले, की थेट फाशी लावणार...
राज्यात सध्या राजकीय गोंधळ सुरु असताना, दुसरीकडे राज्याचे हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये होत आहे. त्यातच सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये चांगलीच जुंपलेली दिसत आहे. वाशीम शहराला लागून असलेली ३७ एकर गायरान जमीन राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी सत्तेचा दुरुपयोग करून एका व्यक्तीला दिल्याचा प्रकार जनहित याचिकेतून उघड झाला होता. यावरून विरोधक चांगलेच आक्रमक झालेले दिसले. विरोधी पक्षनेते अजित पवारांनी अब्दुल सत्तारांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यावरच आता मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले अब्दुल सत्तार?
विरोधीपक्ष सत्तारांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत, ते ठीक आहे. पण याची तुम्ही पहिली चौकशी करणार की नाही? की थेट फाशी लावणार. आधी चौकशी करा. चौकशीत तथ्य निघालं तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री याबाबत निर्णय घेतील. त्यासाठी सरकारचं काम बंद पाडायचं आणि लोकांना मिळणारा न्याय मिळू द्यायचा नाही, ही लोकशाहीमध्ये विधिमंडळाच्या कामकाजाची पद्धत नाही. अशी टीका गुलाबराव पाटलांनी केली.
पाटील पुढे म्हणाले, एकीकडे विधिमंडळाचं कामकाज होऊ द्यायचं नाही आणि दुसरीकडे निषेध करायचा. खाली बसून टाळ्या वाजवायच्या. सरकारला बदनाम करायचं, हे सर्व एक प्रकारचं षडयंत्र आहे. पण हे लोकांच्या मनातलं सरकार आहे, आम्ही चांगल्यापद्धतीने काम करतोय. असे गुलाबराव पाटील एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले.