'अटक ही कायदेशीर कारवाई' आव्हाडांच्या अटकेनंतर मंत्री सामंतांची प्रतिक्रिया
'हर हर महादेव' हा चित्रपट मागचे काही दिवस राज्यातील राजकारणाच्या केंद्रस्थानी राहिला आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी या संभाजीराजे छत्रपती यांनी या चित्रपटावर आक्षेप घेतल्यानंतर या चित्रपटावरून राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी ठाण्याच्या विवियाना मॉलमध्ये सुरु असलेला हर हर महादेव चित्रपटाचा शो बंद पाडला होता. यावेळी एका प्रेक्षकाला मारहाण करण्यात आली होती. त्यावरच आता आव्हाडांना अटक करण्यात आली आहे. या अटकेनंतर अनेक राजकीय प्रतिक्रिया येत आहे. याच पार्श्वभूमीवर मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले उदय सामंत?
जितेंद्र आव्हाड यांच्या अटकेनंतर माध्यमांशी बोलताना सामंत म्हणाले की, आव्हाडांवर गुन्हा दाखल झाला होता, त्यानंतर करण्यात आलेली अटक ही कायदेशीर कारवाई आहे, असे मंत्री आणि शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी म्हटले आहे. या बाबतीत राजकीय स्पर्श करण्याची आवश्यकता नाही. कारण, विवियाना मॉलमध्ये एका तरुणाला त्याच्या कुटुंबासमोर मारहाण झाली होती, ही बाब आपण सर्वांनी पाहिली आहे. त्यामुळे, त्यावरुन करण्यात आलेली ही कारवाई असल्याचेही सामंत यावेळी म्हंटले.
पुढे ते म्हणाले की, "कायदा सुव्यवस्थेला बाधा येईल असे वर्तन कोणाकडूनही घडू नये. मारहाणाची व्हिडीओ आल्यानंतर पोलिसांकडून त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कायदा आणि सुव्यवस्थेला कोणीही आव्हान देवू नये, बिघडवू नये. पोलिसांना आपलं काम करतायेत, त्यांचं त्यांना काम करू दिले पाहिजे," असे आवाहन यावेळी सामंत यांनी केले.