वाद पुन्हा उफाळणार! बच्चू कडू माझ्यासाठी एकदम छोटा विषय, रवी राणांची बोचरी टीका
शिंदे समर्थक आमदार बच्चू कडू आणि भाजप समर्थक आमदार रवी राणा यांच्यामधील वाद संपूर्ण महाराष्ट्राने बघितला. अनेक टीका, गंभीर आरोप एकमेकांवर केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीमुळे हा वाद थंडावला आहे. मात्र, रवी राणा यांनी माघार घेतल्यानंतर बच्चू कडू यांनी देखील मेळाव्यात राणा यांची माफी न मागता रवी राणा यांना इशारा दिला होता. त्यालाच प्रत्युत्तर देतांना रवी राणा आज मुंबईत माध्यमांशी बोलताना बच्चू कडू यांच्यावर बोचरी टीका केली आहे. यामुळे रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यामधला वाद पुन्हा उफाळण्याची शक्यता आहे.
काय म्हणाले रवी राणा?
एक लक्षात ठेवा, कुणी जर मला दम देत असेल. तर रवी राणाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा दम खालला नाही. बच्चू कडू तर काहीच नाही. ते दम देऊन बोलत असतील तर त्यांना जशास तसे उत्तर मी देयाला तयार आहे. मग ते उत्तर कोणत्याही पातळीवर असूदे. तर मी उत्तर देईन” असे विधान रवी राणा यांनी केले.
“ते ज्या स्तरावर म्हणतील त्या स्तरावर उत्तर द्यायला तयार आहे. पण प्रेमाची भाषा बोलले तर रवी राणा दहा वेळा झुकायला तयार आहे. पण कुणी दम देऊन बोलत असेल तर त्याला घरात घुसून मारण्याची देखील हिंमत आहे”, ते गंभीर वक्तव्य राणा यांनी माध्यमांशी बोलताना दिले. “मंत्री बनणे किंवा नाही बनणे हा माझा अधिकार नाही. तो मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा अधिकार आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे माझे नेते आहेत. त्या दोन्ही नेत्यांचा आदर-सन्मान करुन मी माघार घेत दिलगीरी व्यक्त केली आहे. कुणाचंही मन दुखू नये म्हणून तो विषय मी संपवला आहे”, असे रवी राणा म्हणाले.
पुढे राणा म्हणाले की, “पण बच्चू कडू हे वारंवार दम देत असतील की मी रवी राणाला माफ करणार नाही. अरे माफ काय, तुला कुणी सांगितले माफ करायला. तुझ्यामध्ये एवढी हिंमत असेल तर तू कसा निवडून येतो ते पाहा. वेळ सांगेल की बच्चू कडू पुन्हा आमदार बनेल की नाही बनणार”, असा इशारा बच्चू कडू यांनी दिला.
“उद्धव ठाकरे ज्यापद्धतीने राहत होते, शेवटी त्यांना पुन्हा मातीत धूळ खावी लागली. शेवटी लोकं अशी आखडतात की जे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा सन्मान करत नाहीत”, असे राणा म्हणाले. एखाद्या गोष्टीला संपवण्यासाठी एखादा आमदार मन मोठं करुन संपवत असेत तर त्याला दादागिरीची भाषा वापरत असेल तर बच्चू कडू हा विषय माझ्यासाठी एकदम छोटा आहे. त्यांना कुठल्या भाषेत कधी उत्तर द्यायचं ते मला कळतं. फक्त मी हा विषय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या आदरामुळे संपवला आहे. असा जोरदार निशाणा यावेळी राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर पुन्हा साधला आहे.