'अलिबाबा आणि त्याचे ४० जण' राज ठाकरेंची चौफेर टीका
मुंबई : गुढीपाडव्यानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची शिवतीर्थावर सभा पार पडली. यावेळी राज ठाकरे यांनी शिवसेनेतील फुटीनंतर पहिल्यांदाच या विषयावर भाष्य केले. सोबतच इतर विषयावर देखील राज ठाकरेंनी मत व्यक्त केले आहे. यावेळी भाषणात बोलताना त्यांनी शिवसेना फुटीपासून तर ठाकरे गट प्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत चौफेर टीका केली.
नेमकं काय म्हणाले राज ठाकरे?
शिवाजी पार्क मैदानावरून महाराष्ट्राला संबोधित करताना राज ठाकरे म्हणाले की, अलिबाबा आणि त्याचे ४० जण गेले, त्यांना चोर म्हणता येत नाही. कारण ते चोर नाहीत. यालाच (उद्धव ठाकरे) वैतागून गेले. अशी टीका उद्धव ठाकरेंवर त्यांनी केली. कोविड काळात भेटायला तयार नव्हते. एक आमदार मुलासह भेटायला गेले होते, मुलाला बाहेर ठेवले. का मुलाला बाहेर ठेवले तर कोविड होत नाही, महाराष्ट्रात लूट करून सुरतला गेलेले हे पहिलेच. असे राज ठाकरे म्हणाले.
पुढे ते म्हणाले की, एकनाथ शिंदे यांना एकच सांगायचे आहे. मुख्यमंत्री म्हणून बसले आहात, तर काम करा उद्धव ठाकरेंच्या मागे जात सभा घेत बसू नका. वरळीला व खेडला मागे सभा घेत आहे. फिरवत बसतील तुम्हाला, पेन्शनचा विषय आहे. शेतकऱ्यांचा प्रश्न आहेत?किती प्रश्न आहेत. सभा कसल्या घेत बसलात. असा निशाणा त्यांनी मुख्यमंत्री शिंदेंवर साधला.