सरकारकडून बैठकीत बरं बरं बोललं जात होतं, खरं खरं नव्हतं; राजू पाटलांची खोचक टीका
कल्याण : मराठा आरक्षणासंदर्भात काल सर्वपक्षीय बैठक संपन्न झाली. या बैठकीत मनसे आमदार राजू पाटील यांनी देखील मराठा आरक्षणाला समर्थन दिलं आहे. या बैठकीबाबत बोलताना मनसे आमदार राजू पाटील यांनी पुन्हा सरकारला लक्ष केलं आहे. या बैठकीत सरकार स्पष्ट काय बोलायला तयार नव्हते, बरं बरं बोललं जात होतं मात्र खरं खरं बोललं जात नव्हतं, असा खोचक टोला सरकारला लगावला.
मराठा आरक्षणाबाबत झालेल्या बैठकीबाबत बोलताना आमदार राजू पाटील म्हणाले, सरकारच्या अंगाशी आल्याशिवाय ते सर्वपक्षीय बैठक बोलवत नाहीत, त्यांच्या अंगाशी आलं की त्यांना आमचे खांदे पाहिजे असतात, महाराष्ट्र हिताचा विचार करून सगळे एकत्र येतात, त्यांनी ही गोष्ट 40 दिवसांपूर्वी सांगायला पाहिजे होती, तांत्रिक बाबी लोकांना समजून सांगा. सरकार बसवणं, उठवणं, पळवा-पळवी याच्यातच वेळ गेलाय, अशी टीकाही त्यांनी केली.
मराठा समाजाला सत्य परिस्थिती सांगावी, काही गोष्टी न्यायालयाकडून होणार आहेत, काही प्रशासकीय बाबी आहेत, मराठा आरक्षण दिल्यानंतर ते टिकले पाहिजे या सगळ्या गोष्टींचा चारही बाजूने विचार केला पाहिजे, सरकार आता सकारात्मक चाललेय, त्यांनी सरकारला वेळ दिला पाहिजे. आपल्या जीवाशी खेळ न करता समजूतदारपणाची भूमिका घेऊन त्यांनी पुढे चालले तर मराठी आरक्षण मिळायला काही अडचण होणार नाही, यासाठी वेळ जाईल हे सरकारने सांगायला पाहिजे, मराठी समाजाला विश्वासात घ्यायला पाहिजे, असेही त्यांनी म्हंटले आहे. इतके वर्ष गेले तर थोडं एक पाऊल मागे घेऊन समजूतदारपणा दाखवून संयम ठेवायला पाहिजे, असं आवाहन राजू पाटील यांनी मराठा समाजाला केलं.