खासदार जलीलांचा माजी उद्योगमंत्री देसाईंवर एक हजार कोटींचा घोटाळ्याचा आरोप
राज्यात सध्या अभूतपूर्व राजकीय गोंधळ सुरु आहे. त्यातच नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन पार पडत आहे. मात्र, या अधिवेशनादरम्यान, सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये जोरदार आरोप- प्रत्यारोप सुरु आहे. हे सुरु असताना आता औरंगाबाद खासदार इम्तियाज जलील यांनी माजी राज्याचे माजी उद्योगमंत्री यांच्यावर औद्योगिक जमीन वापराचे उद्देश बदलून तब्बल एक हजार कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे पुन्हा मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषद घेत हे आरोप केले असून या प्रकरणांची देखील चौकशी झाली पाहिजे अशी मागणी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून औरंगाबाद जिल्ह्यात उद्योग येणे बंद झाले आहेत. तर गेल्या काही काळात औरंगाबादमध्ये एमआयडीसीच्या जागा विक्रीचा गोरखधंदा सुरु आहे. तर महाविकास आघाडीत उद्योग मंत्री राहिलेले आणि औरंगाबाद जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री सुभाष देसाई यांनी आपल्या कार्यकाळात कोणतेही उद्योग आणले नाहीत. मात्र उद्योगासाठी असलेल्या एमआयडीसीच्या जागा मात्र त्यांनी विक्री केल्या असल्याचा आरोप खासदार जलील यांनी केला आहे.
इंडस्ट्रियल प्लॉटचा वापर उद्देशचा बदल करून हजारो कोटींचा घोटाळा देसाई यांनी केला. बिल्डरांकडून कोट्यावधी रुपये घेऊन प्लॉट नियमबाह्य पद्धतीने देण्यात आले. या सर्व प्रकरणात देसाई यांचा मुलाचा सहभाग होता. देसाई यांचा मुलगा संबधित बिल्डरांशी संपर्क करून रेट ठरवित होता. तर हा सर्व घोटाळा तब्बल एक हजार कोटीच्या घरात असल्याचा आरोप खासदार इम्तियाज जलील यांनी केला आहे.
एकट्या औरंगाबादमध्ये शंभर-सव्वाशे कोटींचे प्रकरण समोर आले आहे, मग राज्यातील मोठ्या शहरातील एमआयडीसीमधील किती भूखंडांचे उद्देश बदलण्यात आले असतील, याचा अंदाज लावला तर हा घोटाळा एक हजार कोटींच्यावर जाईल. गेल्या दहा-पंधरा वर्षात राज्यातील ३२ हजार एकर इंडस्ट्रीयल भुखंडांचे उद्देश बदलण्यात आले आहेत, यात नारायण राणे, उद्योगमंत्री असतांनांच्या काळातील काही एमआयडीसीतील भुखंडाचा देखील समावेश असल्याचा आरोपही इम्तियाज जलील यांनी केला.