काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज नाशिक दौऱ्यावर होते. नाशिकमध्ये आज त्यांनी काँग्रेस मेळाव्याला उपस्थिती दर्शवली. यावेळी त्यांनी उपस्थित सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचे विविध विषयावर संबोधन केले. मात्र, या भाषणा दरम्यान त्यांनी एक खळबळजनक विधान केलं आहे. कोरोनासाठी सगळ्यांना दिवे पेटवायला लावल्याने डॉक्टरही परेशान झाले होते. ताट वाजवायला लावल्याने देशात अवदसा आली. असे विधान पटोलेंनी यावेळी केलं.
काय म्हणाले नाना पटोले?
नाशिक मध्ये मेळाव्यात बोलताना ते म्हणाले की, कोरोना जाणून बुजून देशात आणला. कोरोना काळात परिस्थिती बाबत खासदारांच्या समितीने रिपोर्ट दिला की दुसऱ्या टप्प्यात केंद्र सरकारच्या चुकीमुळे मृत्यू जास्त झाले. केंद्रातील सरकार पश्चिम बंगालच्या निवडणूकित व्यस्त होते. देशाच्या सीमा बंद करण्यात आल्या नाहीत, गुजरात मध्ये गर्दी गोळा करण्यात आली. कोरोनासाठी सगळ्यांना दिवे पेटवायला लावल्याने डॉक्टरही परेशान झाले होते. कोरोना काळात पंतप्रधान मोदी यांच्या ताट वाजवण्याच्या आव्हानांवर बोलताना पटोले यांनी लहानपणीच्या एका गोष्टीचे वर्णन करत त्यांनी ताट वाजवायला लावल्याने देशात अवदसा आली. असे खळबळजनक वक्तव्य त्यांनी केले.
मी अयोध्येला जाणार- नाना पटोले
सोबतच त्यांनी ते म्हणाले की, योग्य वेळी रामजन्मभूमीवर जाऊ. मी अयोध्येला जाणार आणि तुम्हा सगळ्यांना घेऊन जाणार असून गोळा केलेले पैसे कुठे गेले असा सवाल पटोले यांनी उपस्थित केला.सोबतच त्यांनी निवडणुकीबाबत काँग्रेस मेळाव्यात एकला चलो रेची भूमिका स्पष्ट केली.