येड्याचे सरकार मराठवाड्याला टुरीझमला जातंय का? पटोलेंचा सरकारवर घणाघात
उदय चक्रधर | भंडारा : मराठा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त मराठवाड्यात मंत्रिमंडळ बैठक होणार आहे. या बैठकीसाठी संपूर्ण मंत्रिमंडळ मराठवाड्यात दाखल होणार आहे. या मंत्र्यांच्या राहण्याची, खाण्याची सोय करण्याकरता सरकारने उधळपट्टी केल्याचा आरोप विरोधकांनी केलाआहे. तर, कॉंग्रस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही शिंदे-फडणवीस सरकारवर सडकून टीका केली आहे. मराठवाड्यात मंत्रिमंडळाची बैठक म्हणजे जनतेच्या पैशाची उधळपट्टी आहे. तर हे येड्याचे सरकार मराठवाड्याला टुरीझमला जातंय का, अशा शब्दात पटोलेंनी हल्लाबोल केला आहे.
आजपर्यंत मराठवाड्यामध्ये ज्या काही मंत्रिमंडळाच्या बैठका झाल्यात त्या विश्रामगृहात झाल्या आहेत. मात्र, 16 तारखेला संभाजीनगरमध्ये होणारी बैठक ही फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये होणार आहे. त्यामुळे हे येड्याच सरकार मराठवाड्याचे मुलभूत प्रश्न सोडून टुरीझमसाठी मराठवाड्यात जातंय का? असा सवाल नाना पटोले यांनी उपस्थित करीत मराठवाड्यात मंत्रीमंडळाची बैठक म्हणजे जनतेच्या पैशाची उधळपट्टी असल्याचा घणाघात केला आहे.
तसेच, फाईव्ह स्टार ही संस्कृती भाजपाची आहे. त्यामुळेच मंत्रिमंडळाची बैठक ही फाईव्हस्टार हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आली. केव्हापर्यंत आपण काँग्रेसवर आरोप करणार इतिहासाची पाने पलटवून पाहा काँग्रेसने काय केले ते. तेव्हा मुनगंटीवाराच्या प्रमाणपत्राची आम्हाला नाही, असा पलटवारही त्यांनी सुधीर मुनगंटीवारांवर केला आहे.
दरम्यान, राज्यात शासकीय भरती रखडलेली असताना आता राज्य सरकारनं कंत्राटी कामगारांच्या भरतीचा जीआर काढला आहे. यावरुनही नाना पटोलेंनी सरकारवर निशाणा साधला. आता शासकीय नोकऱ्यांचे कंत्राट खासगी कंपन्यांना देऊन बेजगार तरूण-तरूणींच्या जखमेवर मीठ चोळण्याचे पाप करीत असून याचे परिणाम सरकारला लवकर भोगावे लागतील, अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली.