'अशोक चव्हाणांनी शिंदेंबाबत केलेलं विधानंं म्हणजे हायकमांडचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न'

'अशोक चव्हाणांनी शिंदेंबाबत केलेलं विधानंं म्हणजे हायकमांडचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न'

एकनाथ शिंदे यांच्याबाबतील दाव्यांवरुन नरेश म्हस्के यांचं सडेतोड प्रत्युत्तर

ठाणे : कॉंग्रेस आमदार अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत केलेल्या खुलाशानंतर आता राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. अशातच शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख आणि प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी केलेल्या विधानाचा खरपूस समाचार घेतला आहे. ज्या चव्हाणांनी संपूर्ण महाराष्ट्रासमोर 'आदर्श' घालून दिला त्यांनी केलेल्या वक्तव्याला महत्व देत नसल्याचे मत म्हस्के यांनी व्यक्त केले आहे.

नरेश म्हस्के म्हणाले, अशोक चव्हाण यांचे एकनाथ शिंदे यांच्याबाबत केलेले विधान म्हणजे हाय कमांडचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न आहे. ज्यांच्या स्वतःबद्दल गेल्या काही दिवसात ते नाराज असून इकडे तिकडे जाणार अशा बातम्या येत आहेत. स्वतः विधान परिषदेच्या निवडणुकीला गैरहजर राहिले ते आता माध्यमांचे लक्ष वेधून घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप करत असून त्याला फार महत्व देण्याची गरज नसल्याचे मत व्यक्त केले.

त्यासोबतच चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना खैरे हे ज्येष्ठ नेते असले तरीही गेली काही वर्षे निवडणूक हरल्यानंतर त्यांनी केलेली वक्तव्य ऐकली तर ते पक्षासोबत किती एकनिष्ठ आहेत हे सगळ्यांनाच समजलं असते. त्यावेळी आदित्य ठाकरे यांच्या पाया पडतानाचा त्यांचा फोटो देखील व्हायरल झाला होता. मात्र, आता ते मातोश्रीचे मन जिंकण्यासाठी वाट्टेल ते बरळत आहेत.

दुसरीकडे, अंबादास दानवे हे यंदा पहिल्यांदा टेंभी नाक्यावरील देवीच्या दर्शनाला आले होते. यापूर्वी कधीही ते ठाणे शहरात या देवीच्या दर्शनाला आले नव्हते. यावेळी लोकांची सहानुभूती मिळवण्यासाठी पहिल्यांदाच त्यांनी या नवरात्रोत्सवाला हजेरी लावली. देवीच्या दर्शनासाठी आल्याने त्यांचा उचित मान ठेवण्यात आला. दिघे साहेबांच्या पश्चात या देवीचा नवरात्रोत्सवाच आयोजन आणि त्यांनी सुरु केलेले उपक्रम एकनाथ शिंदे हेच पुढे घेऊन जात आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल बोलताना त्यांनी भान बाळगावे, असा सल्ला म्हस्के यांनी दिला.

दरम्यान, नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला निवडणूक चिन्हाबाबाबत निर्णय घ्यायचा अधिकार असल्याचे स्पष्ट केल्याने या लढ्यात देवी कोणासोबत आहे ते स्पष्ट झाले असल्याचे म्हस्के यांनी म्हंटले. कोणतेही विचार नसलेली लोकं वाट्टेल ते बोलण्याचा प्रयत्न करत असल्याने त्यांना फार महत्व देण्याची गरज नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com