फडणवीसांच्या 'त्या' गौप्यस्फोटावर शरद पवारांची महत्वाची प्रतिक्रिया; म्हणाले, मला वाटलं देवेंद्र हा...
राज्यात सध्या प्रचंड राजकीय गोंधळ सुरु आहे. त्यातच काही दिवसांपासून भाजपच्या नेत्यांकडून अजित पवारांना पहाटेच्या शपथविधीवरून डिवचण्याचे काम सुरु होते. त्यानंतर आज शपथविधीबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासोबत 2019ला झालेला शपथविधी हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना विचारूनच झाला होता. असा मोठा गौप्यस्फोट त्यांनी केला. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. त्यावरच आता शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले शरद पवार?
2019ला झालेल्या अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा पहाटेच्या शपथविधीबाबत फडणवीस यांनी मोठे विधान केले. त्यावर माध्यमांकडून शरद पवारांना विचारण्यात आले असता ते म्हणाले की, “मला वाटलं देवेंद्र हा सुसंस्कृत माणूस आहे. सभ्य माणूस आहे. असत्याचा आधार घेऊन ते अशाप्रकारचं स्टेटमेंट करतील असं मला कधी वाटलं नाही”, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी यावर दिली.
काय म्हणाले होते देवेंद्र देवेंद्र फडणवीस?
शिवसेना आमच्याशी बोलण्यासही तयार नव्हते. माझ्यासोबत दोनवेळा विश्वासघात झाला. पहिल्यांदा उद्धव ठाकरे यांनी केला. आमच्यासोबत निवडणुका लढवल्या, पण आपला मुख्यमंत्री होणार नाही हे लक्षात आल्यावर त्यांनी माझा फोनही घेतला नाही. त्यांना मुख्यमंत्रीपदाची खूर्ची इतकी प्रिय झाली की ते राष्ट्रवादी आणि काँग्रेसबरोबर निघून गेले. दुसरा विश्वासघात आपण सर्वांनी बघितला. शरद पवारांशी चर्चा झाल्यानंतरच सर्व गोष्टी ठरल्या होत्या, पण ठरलेल्या गोष्टी बदलल्या. हा देखील एकप्रकारचा विश्वासघातच आहे.
राजकारणात एखादी व्यक्ती तुम्हाला धोका देते त्यावेळी तुम्हाला चेहरा पाहत बसता येत नाही. त्यामुळे आम्ही निश्चय केला की चला ठिक आहे. म्हणून आम्ही त्यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी शरद पवार यांच्यासोबतच चर्चा झाली होती. ती काही खाली चर्चा झाली नव्हती. शरद पवारांशी चर्चा झाल्यानंतर गोष्टी ठरल्या. आम्ही सरकार बनवण्याची सर्व कवायत पूर्ण केली. म्हणजे खातेवाटप कसं असणार, पालकमंत्री कोणाला मिळणार या सर्व गोष्टी अंतिम झाल्या होत्या आणि हे सर्व अजित पवारांशी नाही तर शरद पवारांशी बोलणं झालं होतं.
प्रत्येक गोष्ट शरद पवार यांच्याशी बोलून अंतिम करण्यात आली होती. राजकारणात कधी कधी असं होतं, म्हणजे जे राष्ट्रपती शासन लागलं, त्यासाठी राष्ट्रवादीची जे पत्र होतं, ते पत्रही मीच लिहिलं होतं. त्या ठरल्यानंतर कशा बदलल्या आपण सगळ्यांनी बघितलं आहे. त्यामुळे त्याही ठिकाणी एकप्रकारचा विश्वासघात झाला. पहिला विश्वासघात जास्त मोठा होता. कारण आपल्याच व्यक्तीने केला होता. तर दुसरा छोटा होता. असा देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.