सरकारला सत्तेची मस्ती आली, अजित पवारांचा शिंदे-फडणवीस सरकारवर घणाघात
राज्यात सध्या प्रचंड राजकीय गदारोळ सुरु आहे. त्यातच दुसरीकडे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक युद्ध सुरु आहे. त्यातच आज सांगली दौऱ्यावर असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी शिंदे- फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा साधला. आरेवाडी ग्रामपंचायतीच्या नूतन ग्राम सचिवालय इमारतीचा लोकार्पण आणि विविध विकासकामांचा शुभारंभ सोहळ्यात बोलत असताना त्यांनी ही टीका केली.
काय म्हणाले अजित पवार?
सांगलीत एका कार्यक्रमामध्ये बोलत असताना अजित पवार म्हणाले की, सरकारचं काय चाल्लंय? आम्ही आर आर अनेक वर्षे सत्तेमध्ये होतो, पण आम्ही असं कधी चुकीचे वागलो नाही. राज्यातील सरकारला सत्तेची मस्ती आली आहे. पक्षांतर बंदी कायदाला तिलांजली दिली आहे, कंर्नाटक, मध्य प्रदेशमध्ये सरकार पाडले. हे सर्व 50 खोके सरकार ओके. खालच्या पातळीवरचे राजकारण सुरु आहे, त्यामुळे लोकशाही आणि संविधान धोक्यात येईल. अशा शब्दात त्यांनी टीका केली.
पुढे ते म्हणाले की, राज्याच्या मंत्री मंडळात एक पण महिला नाही, तुमच्या पोटात दुखतं का? महिलांना का घेत नाही? विस्तार पण करत नाही. राज्यात अत्यंत गलिच्छ राजकारण सुरू आहे. मंत्रिमंडळ पण वाढवत नाही, सगळ्यांनी मंत्री करतो म्हणून गाजर दाखवले. मात्र, सत्ताधाऱ्यांना भीती वाटत आहे का मंत्रिमंडळ विस्तार करण्याची? अशा सवाल त्यांनी केला.
या सरकारचं काय चाल्लंय, छत्रपती यांच्याबद्दल बेताल बोलतात. आम्ही कसं खपवून घ्यायचे? शाहू, फुले आणि कर्मवीर यांच्याबद्दलही बोलतात. सरकारचे आमदार, मंत्री देखील बोलत आहेत.त्यांना लाज लज्जा शरम आहे का नाही? छत्रपती संभाजी महाराजांचा स्वराजरक्षक संबोधून मी काही चुकीचं बोललो नाही, पण ज्यांनी महापुरुषांच्या अवमान केला त्यापासून लक्ष विचलित करण्यासाठी विरोधाकांकडून टुकारपणा चालू आहे, असा आरोप अजित पवारांनी केला.