तब्बल 21 महिन्यांनंतर देशमुख नागपुरात, भावुक होऊन म्हणाले, मी माझ्या...
सीबीआय आणि ईडीच्या प्रकरणातून जामीन मिळाल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आज तब्बल 21 महिन्यांनंतर नागपुरात दाखल झाले. तुरूंगातून बाहेर आल्यानंतर आज प्रथमच ते नागपुरात आले. यावेळी नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच उत्साह पाहायला मिळाला. त्याठिकाणी कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. कार्यकर्त्यांचं प्रेम आणि स्वागत पाहून अनिल देशमुख भावूक झालेलेही बघायला मिळाले. सोबतच देशमुखांनी यावेळी माध्यमांशी देखील संवाद साधला.
काय म्हणाले अनिल देशमुख?
नागपुर विमानतळावर दाखल झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना देशमुख म्हणाले की, 21 महिन्यानंतर मी माझ्या नागपूर गावात येतोय. याचा मला अतिशय आनंद आहे. मला खोट्या गुन्ह्यात फसवण्यात आलं होतं. स्वागतासाठी आलेल्या कार्यकर्त्यांना पाहून मोठा आनंद झालाय. मी काटोल मतदार संघात नव्हतो. परंतु, मुलगा सलील हा कायम नागरिकांच्या संपर्कात होता, असे अनिल देखमुख यावेळी म्हणाले.
अनिल देशमुख यांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून जय्यत तयारी करण्यात आली होती. विमानतळावर दाखल होतात कार्यकर्त्यांनी अनिल देशमुख यांचं फटाके वाजवून, ढोल ताशांच्या गजरात फुलांची उधळण करत जंगी स्वागत केलं. 2021 मध्ये अटकेनंतर तब्बल 21 महिन्यांनी अनिल देशमुख हे नागपुरात दाखल झाले. ठिकठिकाणी त्यांचे स्वागत करण्यात आले.यावेळी कार्यकर्त्यांचं प्रेम आणि स्वागत पाहून अनिल देशमुख भावनिक झाले. कार्यकर्त्यांच प्रेम पाहून त्यांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या होत्या. या स्वागताबद्दल त्यांनी कार्यकर्त्यांचे आभार देखील मानले.