एकनाथ खडसेंचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले, 2019ला मुख्यमंत्रीपदासाठी माझे नाव...
राज्यात सध्या प्रचंड राजकीय गोंधळ सुरु आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये जोरदार शाब्दिक वाद सुरु असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. जळगाव येथे पत्रकार परिषदेत बोलत असताना एकनाथ खडसे यांनी अनेक गौप्यस्फोट केले आहेत. 2019 च्या निवडणुकीनंतर माझेच नाव मुख्यमंत्रीपदासाठी घेतले जात होते. मात्र त्याआधीच 2016 रोजी मला राजीनामा द्यावा लागला होता. असे विधान त्यांनी केले.
नेमकं काय म्हणाले एकनाथ खडसे?
पत्रकार परिषदेत बोलत असताना एकनाथ खडसे म्हणाले की, 2019 च्या निवडणुकीनंतर माझेच नाव मुख्यमंत्रीपदासाठी घेतले जात होते. मात्र त्याआधीच 2016 रोजी मला राजीनामा द्यावा लागला होता. माझ्यावर खोटे आरोप करुन मला राजीनामा देण्यासाठी भाग पाडले गेले. माझ्याविरोधात घडवून षडयंत्र रचले गेले. ज्या भूखंडाचा आरोप माझ्यावर ठेवला गेला, त्या भूखंडाशी माझा काही संबंध नाही. तो जमीन व्यवहार मी केलेला नाही. ती जमीन देखील पाहिलेली नाही. मी फक्त त्या जमीनीबाबत बैठक घेतली होती. त्याचे प्रोसिडिंग तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रद्द केले होते. केवळ बैठक घेतली म्हणून माझ्या परिवाराची ईडी चौकशी करण्यात आली. त्याआधी लाचलुचपत विभागाने त्याची चौकशी करण्यात आली होती. ईडीच्या चौकशीसाठी माझे जावई गेले असता त्याचदिवशी त्यांची अटक करण्यात आली. मला कोर्टाने संरक्षण दिले असल्यामुळे माझी अटक टळली होती. अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
पुढे ते म्हणाले की, हे सरकार आल्यानंतर पुर्वीच्या समितीने जो अहवाल दिला होता, तो नाकारून पुन्हा चौकशी करण्याची मागणी केली. त्यावर न्यायालयाने सरकारला फटकारले असून तुमचा हेतू शुद्ध नसल्याचे सांगितले आहे. आयकर विभागाने माझी दोन वेळा चौकशी केली, परंतु, त्यात काहीच आढळले नाही. त्यानंतर पुन्हा लाचलुचपत विभागामार्फत दोन वेळा चौकशी झाली. त्यातही काही आढळले नाही. तरीही पुन्हा पुन्हा माझी चौकशी करण्यात येत आहे. काहीतरी शोधून मला अडकवण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे माझा संबंध नसलेल्या प्रकरणातही मला अटक करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. असेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले.