शरद पवार यांच्यानंतर रोहित पवार आक्रमक; म्हणाले, यापुढं शांत बसणार नाही...
राज्यात सध्यस्थितीत अभूतपूर्व राजकीय गोंधळ सुरु आहे. अशातच महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नावरून कर्नाटक सरकारकडून चिथावणीखोर वक्तव्यासोबत कृत्य देखील होत आहे. मात्र महाराष्ट्र-कर्नाटकमध्ये सीमावाद उफाळून आला आहे. कर्नाटकात महाराष्ट्राच्या गाड्यांवर हल्ले झालेत तर महाराष्ट्रातील संघटनाही आक्रमक झाल्या आहेत. त्यावरच आता राजकरण तापलेले असताना राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी कर्नाटक सरकारला इशारा दिला. त्यानंतर आता लगेचच राष्ट्रवादी आमदार रोहित पवार यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत म्हंटले आहे, कन्नड रक्षण वेदिके’चे कार्यकर्ते महाराष्ट्राचे ट्रक फोडून धुडगूस घालत असताना, हवेत राजकीय गोळीबार करणारे भाजपचे नेते कुठं आहेत?निवडणूक डोळ्यापुढं ठेवून कर्नाटकातील भाजप सरकार आक्रमक होतंय, तर महाराष्ट्रातील भाजपप्रणित सरकार मात्र आपली अस्मिता विसरुन मिळमिळीत भूमिका घेतंय.संवादातून मार्ग काढता येतो, पण वाहनांवर दगड मारणं हा कसला संवाद?राज्य सरकारच्या मिळमिळीत भूमिकेमुळं महाराष्ट्र झुकला, असा अर्थ कर्नाटकाकडून काढला जातोय.पण राज्यावर आणि राज्याच्या अस्मितेवर असेच हल्ले होत राहिले, तर कधीही कुणापुढं न झुकणारा महाराष्ट्र यापुढं शांत बसणार नाही, असा उल्लेख करत कर्नाटक सरकारला गर्भित इशारा दिला आहे.