शेतकऱ्यांनी कोणालाच उत्पन्न सांगू नये; असे का म्हणाले शरद पवार?
इंदापुर : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार आज नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. यादरम्यान शरद पवार यांनी इंदापूर तालुक्यातील बोरी गावातील शेतकरी रामहरी जगताप यांच्या आधुनिक द्राक्ष शेतीची पाहणी केली. व शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना सल्ला देताना मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
इंदापूर तालुक्यातील कळस मधुकर खर्चे यांच्या उसाच्या शेताला शरद पवारांनी भेट दिली. मधुकर खर्चे यांनी एका एकरात 100 टनापेक्षा अधिक उत्पादन घेतले आहे. गेली अनेक वर्षे खर्चे हे 100 टनापेक्षा जास्त उत्पादन घेत आहेत. उसाला भेट दिल्यानंतर शरद पवारांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी ते म्हणाले की, साखरेच्या उत्पादनात भारत एक नंबरचा देश आहे. ब्राझील मधील लहान शेतकऱ्यांचा ऊस 50 हजार टन असतो. ब्राझीलमध्ये 6 ते 7 ऊस उत्पादक शेतकरी कारखाना चालवतात. आपल्या येथे काही हजारात सभासद असतात. याआधी एकरी 100 टनपेक्षा जास्त ऊस आणि 50 कांडी ऊस याआधी मी कधीही बघितला नव्हता. हे करण्याचा उद्योग खर्चे यांनी केला आहे.
माझ्या समोर पत्रकार बसले आहेत. किती उत्पन्न मिळाले हे तुम्ही सांगितले. असे सार्वजनिकरित्या सांगत जाऊ नका. नाहीतर पत्रकार लोक दाखवतील की शेतकऱ्यांना एवढे पैसे मिळतात. मग दिल्लीतील लोक शेतकऱ्यांवर कर लावतात, असा मिश्कील टोला त्यांनी मोदी सरकारला लगावला आहे.
तसेच, जम्बो सिडलेस प्रकारचे अतिशय उत्तम द्राक्ष उत्पादन करून हा माल महिंद्रा अॅग्री सोल्युशन या कंपनीद्वारे मलेशिया येथे एक्स्पोर्ट करण्याची सुरुवात आजपासून झाली. याचे मनस्वी समाधान वाटले. यादरम्यान द्राक्ष उत्पादनात येणाऱ्या समस्यांविषयी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला, असेही शरद पवारांनी सांगितले आहे.