सुप्रिया सुळेंनी अखेर मौन सोडले, सत्तारांना दिले जोरदार उत्तर; म्हणाल्या, प्रवृत्ती बाजूला...
राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी काल थेट राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार केला आहे. सत्तारांच्या या विधानाने राजकारणात प्रचंड खळबळ माजली आहे. त्यावरूनच राज्यभर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले होते. अनेकांकडून यावेळी सत्तारांच्या राजीनाम्याची मागणी यावेळी केली जात होती. त्यांच्या विरोधात काही ठिकाणी तक्रार सुद्धा दाखल करण्यात आली आहे. सत्तारांच्या या विधानांवर सुप्रिया सुळे यांनी काल भाष्य टाळले होते. मात्र, आज सुप्रिया सुळे यांनी ट्विटरवरून आपले मत मांडले आहे. आपण या सगळ्या प्रवृत्ती बाजूला टाकूयात आणि महाराष्ट्राची जी सुसंस्कृत परंपरा आहे, ती जतन करुया. असा टोला त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून सत्तारांना लगावला आहे.
नेमकं काय केले सुप्रिया सुळे यांनी ट्विट?
महाराष्ट्राच्या एका मंत्र्याकडून काही अपशब्द वापरले गेले,याची प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रात उमटली. कारण अशा प्रकारची वक्तव्ये ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. असं बोलणं-वागणं ही आपली परंपरा नाही. अशा प्रकारची वक्तव्ये सत्तेच्या केंद्रस्थानी बसलेल्या लोकांकडून अपेक्षित नसतात.
मला आवर्जून असे सांगायचे आहे की, जर कुणी चुकीचे बोलले असेल, त्यांनी महिलांचा सन्मान जपला नसेल म्हणून आपण अस्वस्थ होणं स्वाभाविक असलं तरी आपण या सगळ्या प्रवृत्ती बाजूला टाकूयात आणि महाराष्ट्राची जी सुसंस्कृत परंपरा आहे, ती जतन करुया.
याप्रसंगी राज्यातील विविध क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी, जाणकारांनी समंजसपणाची भूमिका दाखवून महाराष्ट्र हा 'सुसंस्कृतच महाराष्ट्र' आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित केले याबद्दल मी मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त करते. धन्यवाद. जय हिंद-जय महाराष्ट्र ! असे ट्विट त्यांनी आज केले आहे.
काय केले होते सत्तारांनी वादग्रस्त विधान?
सुप्रिया सुळेंनी 50 खोके मिळाले का, असा प्रश्न अब्दुल सत्तारांना केला होता. यावर सत्तारांनी तुम्हालाही द्यायचे का, असा प्रतिप्रश्न केला होता. सुप्रिया सुळे यांनी प्रत्युत्तर देत तुमच्याकडे असल्यानेच तुम्ही ऑफर करत असल्याची टीका केली होती. तर, सत्तारांनी इतकी भि***ट झाली असेल तिलाही देऊ, अशा शब्दात उत्तर दिले.