महाराष्ट्राला गद्दारी आवडत नाही; सुळेंचा शिंदे- फडणवीस सरकारवर निशाणा
बारामती : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आज बारामती दौऱ्यावरती असून बारामती शहरातील विविध ठिकाणची पाहणी करून गावभेटीचे आयोजन केले होते. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना सुप्रिया सुळे यांनी शिंदे सरकारवर निशाणा साधला. महाराष्ट्रातील जनतेला गद्दारी आवडत नाही, असा खोचक टोला सुळे यांनी शिंदे-फडणवीस सरकारला लगावला आहे.
ज्या पद्धतीने महाराष्ट्राची वर्तमानपत्रांमध्ये व इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये बदनामी झाली. फक्त खोक्यांची चर्चा झाली. यामुळे महाराष्ट्राचे राजकीय-सामाजिक मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असल्याचा गंभीर आरोपही सुळे यांनी राज्य सरकारवर केला.
त्यामुळे लोकांच्या मनामध्ये रोष असून महाराष्ट्रासोबत गद्दारी झाली आहे ती जनतेला आवडली नाही. त्यामुळे आलेल्या प्रसिध्द मासिकाच्या सर्व्हेचे मी मनापासून स्वागत करते. महागाईमुळे महाराष्ट्र भरडला जात असल्यामुळे कदाचित हा सर्व्हे भारतीय जनता पार्टीविरोधात आला असावा, असा टोला देखील सुप्रिया सुळे यांनी सरकारला लगावला.
राज्यामध्ये शिवशक्ती व भीमशक्ती युती झाली. यामध्ये प्रकाश आंबेडकरांनी शरद पवार हे आजही भाजप सोबत आहेत, असा आरोप केला होता. यावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, जयंत पाटील आणि संजय राऊत हे या विषयावर बोलले आहेत. त्यामुळे मी याविषयी जास्त बोलणं योग्य नाही, असे म्हणत त्यांनी विषय टाळला.
जयंत पाटील यांनी पहाटेच्या शपथविधी पाठीमागे शरद पवारांची शक्यता असेल या दाव्यावरही सुळेंनी भाष्य केले आहे. काल जयंत पाटलाचं विधान हे जर सगळे व्यवस्थितपणे ऐकले तर हा प्रश्न उद्भवणार नाही आणि यावर मी बोलणं उचित राहणार नाही, असे त्यांनी म्हंटले आहे.
दरम्यान, कोणी कुठला सिनेमा बघायचा हे जर सरकार सांगणार असेल तर ही दडपशाही आहे.. या देशातील जनतेला भारतीय संविधानाने मोकळे श्वास आणि स्वातंत्र्य हे दिलेले आहे. जर संविधानाच्या विरोधात कोणी काही करत असेल तर भारताची जनता हे सहन करणार नाही, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी पठाण चित्रपटाविषयी दिली आहे.