छत्रपतींविषयी संसदेत बोलताना माझा माईक बंद; अमोल कोल्हेंचा आरोप
मुंबई : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयीचे वादग्रस्त विधानावरुन राज्यात वातावरण चांगलेच तापले आहे. राज्यपालांचा सर्वच स्तरातून निषेध करण्यात आला असून कोश्यारींना राज्यपाल पदावरुन हटविण्याची मागणीही विरोधकांकडून जोर धरत आहे. हा मुद्दा आज हिवाळी अधिवेशानातही गाजला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी याविषयीचा प्रश्न आज संसदेत उपस्थित केला. परंतु, छत्रपतींविषयी मी बोलत असताना माझा माईक बंद केल्याचा गंभीर आरोप अमोल कोल्हे यांनी केला आहे.
संसदेतला माईक बंद केला तरी छत्रपती शिवाजी महाराजांविषयीची भावना दाबता येणार नाही, तो तमाम शिवभक्तांचा आवाज कानठळ्या बसवल्याशिवाय राहणार नाही. आज संसदेत छत्रपती शिवाजी महाराजांविषयी बोलत असताना माईकमध्येच बंद करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांसह इतर महापुरुषांविषयी बोलताना कायद्याची तरतूद करण्यात यावी, अशी मागणी मी करत होतो. जेणेकरून आपल्या अस्मितेला नख लावण्याचं आणि छत्रपती शिवरायांचा अपमान करण्याचं धारिष्ट कोणीच करणार नाही, असे अमोल कोल्हे यांनी म्हंटले आहे. यासोबतच अमोल कोल्हे यांनी एक व्हिडीओच सोशल मीडियावर शेअर केला आहे.
दरम्यान, महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद मागील काही दिवसांपासून पुन्हा चिघळला आहे.यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत भाजपावर हल्लाबोल केला. गेल्या १० दिवसांपासून महाराष्ट्राविरोधात षडयंत्र रचण्यात आले. दोन्ही राज्यांमध्ये भाजपाची सत्ता आहे. तरी कर्नाटकचे मुख्यमंत्री महाराष्ट्राविरोधात बोलतात. काल महाराष्ट्राच्या लोकांना मारहाण करण्यात आली. हे चालणार नाही, असे सुप्रिया सुळे यांनी म्हंटले होते. यावर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सुप्रिया सुळेंची मागणी फेटाळून लावत दोन राज्यांच्या विषयांमध्ये केंद्र सरकार काय करणार, असा अजब प्रश्न विचारला आहे.