कांदे पोहे आता तुमच्या नशिबात नाही, त्याचे शल्य त्यांच्या मनात; दरेकरांचा उध्दव ठाकरेंना टोला
मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाच्या पार्श्वभूमीवर काल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक झाली. या बैठकीत ते ट्विटर अकाऊंट नसल्याचा दावा कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केला होता. यावरुन शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी टीकास्त्र सोडले होते. याला भाजप नेते प्रविण दरेकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
उद्धव ठाकरे टीका, टोमणे, मत्सर यामधून बाहेर येणार का? विकासावर ते बोलणार आहेत का? तुमचे अडीच वर्षांचे पुतळा मावशीचे प्रेम पाहिले आहे. दिल्लीचे महाराष्ट्रावरील प्रेम जनतेने पाहिले आहे. कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केंद्राच्या माध्यमातून पंतप्रधानांनी दिली आहे. कांदे पोहे खाणे तुमच्या नशिबात आता नाही. तुम्ही ती संधी गमावली, त्याचे शल्य त्यांच्या मनात आहे, असा टोला त्यांनी उध्दव ठाकरेंना लगावला आहे.
दरम्यान, अमित शहा यांच्यासोबतच्या बैठकीवरुन उध्दव ठाकरेंनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली होती. मुख्यमंत्र्यांचं ट्वीटर हॅक झाले होते तर, खुलासा करायला इतके दिवस का लागले. हा खुलासा करण्यासाठी दिल्लीत बैठक बोलवेपर्यंत का थांबला होता. प्रत्येकवेळी कर्नाटककडून विषय चिघळवला जातो. महाराष्ट्र प्रेम सरकारमध्ये आहे की नाही? निकाल लागेपर्यंत महाराष्ट्रानेच थांबायच का? या गोष्टींचा नुसता उहापोह करून पोहे खाऊन निघणार असतील तर त्याला काही अर्थ नाही, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली होती.