पवारांवर केलेल्या टीकेनंतर आंबेडकरांना आठवलेंचा सल्ला; म्हणाले, पवारांनी सहकार्य...
राज्यात एकीकडे प्रचंड राजकीय गदारोळ सुरु असताना दुसरीकडे नुकताच शिवसेना ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीची युती झाली. मात्र, युतीनंतर राजकीय वर्तुळात एकच गदारोळ सुरु झाला. परंतु, महाविकास आघाडीतले घटक काँग्रेस-राष्ट्रवादीशी युतीबद्दल चर्चा सुरु आहे. त्यातच प्रकाश आंबेडकरांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीका केली. पवार आजही भाजपाबरोबर आहेत. असे प्रकाश आंबेडकर म्हणाले होते. त्यावरच आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले रामदास आठवले?
प्रकाश आंबेडकर यांनी पवारांवर केलेल्या टीकेवर बोलताना आठवले म्हणाले की, प्रकाश आंबेडकरांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेशी मी सहमत नाही. मराठवाडा विद्यापीठ नामांतर हा अडचणीचा विषय सोडवण्यासाठी शरद पवारांनी सहकार्य केले. फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांबद्दल शरद पवारांनी आपली भूमिका स्पष्ट मांडली आहे. त्यांना काय हवं माहिती नाही. दुसऱ्या बाजूला संजय राऊतांना ओळखत नाही, असे ते म्हणतात. त्यामुळे उद्धव ठाकरेंबरोबरच्या युत्तीबद्दल साशंकता आहे. उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर एकत्र राहतील, असं वाटत नाही. असे विधान आठवलेंनी यावेळी केले.
पुढे ते म्हणाले की, उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर एकत्र आले तरी, त्याला शिवशक्ती आणि भीमशक्ती म्हणता येणार नाही. त्याला शिवशक्ती आणि वंचित शक्ती म्हणता येऊ शकते. या युतीने महाराष्ट्राच्या राजकारणात फारसा फरक पडेल, असे वाटत नाही. असे देखील मत आठवलेंनी यावेळी व्यक्त केले.