आव्हाडांकडून आलेला दबाव नव्हे तर 'हे' आहे का पोलिस अधिकाऱ्याच्या बदलीचं कारण?
'हर हर महादेव' हा चित्रपट मागचे काही दिवस राज्यातील राजकारणाच्या केंद्रस्थानी राहिला आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी या चित्रपटावर आक्षेप घेतल्यानंतर या चित्रपटावरून राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. त्याच पार्श्वभुमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी ठाण्याच्या विवियाना मॉलमध्ये सुरु असलेला हर हर महादेव चित्रपटाचा शो बंद पाडला होता. यावेळी एका प्रेक्षकाला मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अविनाश जाधवांनी हा शो पुन्हा सुरू करायला लावला होता. दरम्यान, आव्हाड यांनी केलेल्या मारहाण प्रकरणी पोलिसांनी काल आव्हाडांना अटक केली होती. त्यांच्यासह राष्ट्रवादीचे माजी खासदार आनंद परांजपे यांच्यासह 11 कार्यकर्त्यांना अटक केली होती. आता आव्हाडांवर कारवाई केलेले डीसीपी विनयकुमार राठोड यांची अचानक बदली करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्या बदलीमागे आव्हाडांचा दबाव आहे की आणखी काही कारण अश्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
डीसीपी विनयकुमार राठोड यांची बदली आता वाहतूक शाखेत करण्यात आली आहे. दरम्यान, या बदलीमागे काल रात्री ठाण्यात व्हायरल झालेले काही फोटोज असल्याचीही जोरदार चर्चा सुरू आहे. ज्या फोटोजमुळे बदली झाल्याची चर्चा सुरू आहे ते फोटोज खालील प्रमाणे.
हे फोटो काल रात्रीच्या सुमारास ठाणे परिसरात व्हायरल झाले. त्यानंतर, ठाण्यातील मनसे कार्यकर्ते या विषयावर आक्रमक झाले. पोलिसांनी ताब्यात घेतलेली व्यक्ती मोबाईल कशी वापरू शकते? ईअरफोन वापरण्याची परवानगी कशी मिळते? पिण्यासाठी पॅकेज्ड ड्रिंकींग वॉटर कसं काय मिळतं? असे सवाल मनसे कार्यकर्त्यांनी विचारायला सुरूवात केली होती. आज जितेंद्र आव्हाडांना जामीन मिळाल्यानंतर मनसेचं हे आंदोलन आणखी मोठं होऊ नये यासाठी म्हणून ही बदली करण्यात आली असल्याची चर्चा ठाण्यात सुरू झाली आहे.