भक्तांनी आता सावध राहा, 2024 च्या निवडणुकीवेळी धर्मांध अफूचं पीक येणार; सामनातून हल्लाबोल

भक्तांनी आता सावध राहा, 2024 च्या निवडणुकीवेळी धर्मांध अफूचं पीक येणार; सामनातून हल्लाबोल

2024 ची निवडणूकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

2024 ची निवडणूकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सर्व पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे. यावरुन ठाकरे गटाचा अग्रलेख सामनातून टीका करण्यात आली आहे.

सामनातून म्हटले आहे की, 2024 च्या निवडणुकांआधी ही सर्व मंदिरे तयार होतील. 2009 व 2014 साली सत्तेवर येण्याआधी मोदी सरकारने अनेक आश्वासने दिली. परदेशातील काळा पैसा परत आणणे, देशातील नागरिकांच्या खात्यात 15 लाख जमा करणे, गरिबी, महागाईचे उच्चाटन करणे, बेरोजगारी नष्ट करणे, कश्मिरी पंडितांची घर वापसी करणे, देशाच्या दुश्मनांना धडा शिकवणे, वीर सावरकरांना भारतरत्न देणे, अशा अनेक घोषणा मोदी सरकारने चुलीत घातल्या आहेत. अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेने त्याची सुरुवात होईल. लोकांना अन्न, वस्त्र, निवारा, महिलांना संरक्षण, प्रतिष्ठा देऊ न शकलेल्या सरकारने धर्माच्या नावाखाली अफूच्या गोळय़ा दिल्या व त्याच नशेचा अंमल कायम राहावा म्हणून 13 हजार कोटी रुपये खर्च करून देशात 21 भव्य मंदिरांचे कॉरिडॉर उभारले जात आहेत.

अफूच्या गोळीने ना धर्माचे रक्षण होते, ना राष्ट्राचे संरक्षण होते. कोरोनाच्या संकटकाळात मंदिरेबंदच होती. डॉक्टर, परिचारिका हेच देवाच्या रूपात वावरत होते. थाळय़ा वाजवून, घंटा बडवून कोरोना पळाला नाही . महाराष्ट्रात तो उद्धव ठाकरे यांच्या कार्यामुळे रोखला . गंगेत माणसांची प्रेते त्या काळात वाहताना जगाने पाहिली . तेथे धर्म होताच , पण विज्ञानाचा वापर झाला नाही व लोकांना गंगेत वाहत मरावे लागले . 2024 साली पुन्हा एकदा धर्मांध अफूचेच पीक काढण्याची तयारी सुरू आहे . 21 मंदिरांचा वापर त्यासाठी होईल . भक्तांनी आता सावध राहावे , इतकेच !मणिपूरपासून जम्मू-कश्मीरपर्यंत प्रश्नच प्रश्न दिसत आहेत. त्यावर सरकारकडे कोणताही तोडगा नाही. पालघर येथे जयपूर-मुंबई एक्प्रेसमध्ये एका माथेफिरू जवानाने गोळीबार करून चारजणांचा बळी घेतला. हे त्या धर्मांध अफूच्या सेवनाचेच परिणाम आहेत.

मंदिरांचा विकास केला हाच मोदींचा प्रचाराचा मुद्दा राहील. कारण तेच त्यांचे हिंदुत्व आहे. लोकांना घंटा बडवण्यात, पूजा-अभिषेक, महाआरत्यांत गुंतवून ठेवण्याची कला भाजपला साधली आहे व त्यासाठी बागेश्वर बाबा, मनोहरपंत भिडे, रामरहिम असे बाबा लोक त्यांनी हाताशी ठेवले आहेत. असे म्हणत सामनातून हल्लाबोल करण्यात आला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com