संजय राऊतांचा अडचणीत वाढ, न्यायालयाने पुन्हा वाढवली कोठडी
गोरेगाव पत्राचाळ घोटाळ्या प्रकरणी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना ईडी चौकशीनंतर न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यांनतर मुंबईतील विशेष न्यायालयाने संजय राऊत यांना १९ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत सुनावली होती. संजय राऊत मागील 50 दिवसांपासून तुरुंगात आहेत. आज न्यायालयीन कोठडी संपल्यानंतर त्यांच्या जामीन अर्जावर तसंच कोठडीबाबत आज एकत्रित सुनावणी पार पडली. याच सुनावणीत राऊत यांची न्यायालयीन कोठडी पुन्हा चौदा दिवसांनी वाढली आहे. त्यांना 4 ऑक्टोबरपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे.
का वाढवली न्यायालयाने राऊतांची कोठडी?
पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीने चार दिवसांपूर्वीच संजय राऊत यांच्याविरोधात पुरवणी आरोपपत्र दाखल केले होते. या गैरव्यवहारात राऊतांचा थेट सहभाग असल्याचा दावा ईडीने केला होता. आज त्या आरोपपत्राची न्यायालयाने दखल घेतली. परंतु आम्हाला अद्याप आरोपपत्राची प्रत मिळालेली नाही, अस राऊत यांच्या वकिलाने न्यायालयाला सांगितले. यानंतर संजय राऊत यांना आरोपपत्राची प्रत देण्याचे आदेश न्यायालयाने ईडीला दिले. जोपर्यंत तुम्ही आरोपपत्र देत नाही, तोपर्यंत संजय राऊत यांच्या कोठडीत आणखी 14 दिवसांची वाढ करत असल्याचे कोर्टाने सांगितले.
काय आहे प्रकरण?
पत्राचाळ येथे म्हाडाचा भुखंड होता. हा भुखंड विकसित करण्यासाठी आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीला काम दिले होते. पण त्यांनी ही जागा परस्पर खाजगी विकासकांना विकली. पत्राचाळमधील 672 रहिवाशींना 650 स्केअर फुटाचे घर देण्यात येणार होते. त्यांच्या या सोसायटीत अनेक अॅनिमिटी देण्यात येणार होत्या. रहिवाशांना 25 कोटी रुपये कार्पस फंड देण्यात येणार होते. त्यातून रहिवाश्यांचे मासिक मेंटेनेंस भरला जाणार होते.