गप्प राहिलो तर उपराष्ट्रपती बनवीन, होती ऑफर; सत्यपाल मलिकांनी फोडला बॉम्ब

गप्प राहिलो तर उपराष्ट्रपती बनवीन, होती ऑफर; सत्यपाल मलिकांनी फोडला बॉम्ब

सत्यपाल मलिक यांनी देशातील सद्यस्थितीवरुन भाजपला दिला घरचा आहेर

जयपूर : मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक हे त्यांच्या कुशाग्र वृत्तीसाठी ओळखले जातात. यावेळी त्यांनी उपराष्ट्रपतींबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. तुम्ही गप्प राहिल्यास उपराष्ट्रपती बनवले जाईल, असे संकेत मलाही मिळाले असल्याचा खुलासा सत्यपाल मलिक यांनी सांगितले आहे. ते सध्या राजस्थान दौऱ्यावर असून ते झुंझुनू जिल्ह्यातील बागड परिसरातील कार्यक्रमात बोलत होते. यावेळी मलिक यांनी देशातील सद्यस्थितीवरुन भाजपला घरचा आहेर दिला आहे.

उपराष्ट्रपतीबाबत बोलताना सत्यपाल मलिक म्हणाले की, जगदीप धनखड हे या पदासाठी पात्र आहेत. पण, मी खरे बोलणे थांबवले तर मला उपराष्ट्रपती बनवले जाईल, असे संकेत दिले होते. पण, मी म्हणालो, मी ते करू शकत नाही. मला जे काही वाटत आहे. ते मी बोलतो. त्यासाठी मला काहीही सोडावे लागले तरी चालेल, असेही त्यांनी सांगितले.

देशातील बिगर भाजप नेत्यांवर ईडी, आयटी आणि सीबीआयच्या छाप्यांवरही मलिक यांनी मोठे वक्तव्य केले आहे. भाजपमध्ये असे अनेक लोक आहेत ज्यांच्यावर ईडी, आयटी आणि सीबीआयने आतापर्यंत छापे टाकायला हवे होते. परंतु, तसे झाले नाही. त्यामुळेच या एजन्सींबाबत देशात वेगळे वातावरण निर्माण झाले आहे. सरकारनेही आपल्या लोकांवर काही कारवाई करावी, जेणेकरून एजन्सींबाबत देशात निर्माण झालेले वातावरण योग्य राहील, असा घरचा आहेर सत्यपाल मलिक यांनी भाजपाला दिला आहे.

तर, सत्यपाल मलिक यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे कौतुक केले आहे. ते म्हणाले, राहुल गांधी चांगले आहेत. एक तरुण आपल्या पक्षासाठी काम करत आहे. नेता पायी चालत आहे. आजच्या काळात असे कोणी करत नाही. त्यांच्या भारत जोडो यात्रेतून काय संदेश जातो ते जनताच सांगेल. पण ते चांगले काम करत असल्याचे दिसते.

उद्योगपती गौतम अदानी यांच्या वाढत्या संपत्तीवरही मलिक यांनी हल्लाबोल केला. ते म्हणाले की, अदानीची संपत्ती वाढत असताना शेतकऱ्यांचे उत्पन्न कमी होत आहे. अदानी हे आशियातील तिसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. सरकार अदानींना पाठिंबा देत असल्याची चर्चा लोकांमध्ये आहे. सध्याची परिस्थिती पाहता सरकार एमएसपीबाबत कोणताही निर्णय घेईल असे वाटत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा आंदोलन करावे लागेल. राज्यपालांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या लढ्याला पाठिंबा देणार असल्याचे मलिक यांनी सांगितले,

दरम्यान, राजपथच्या नामांतरावरही मलिक यांनी भाष्य केले. पंतप्रधानांच्या कार्याला माझा नेहमीच पाठिंबा असतो, मात्र, कर्तव्यमार्ग म्हणून राजपथला नाव देण्याची गरज नव्हती. राजपथ हे नावही बरोबर होते. मी बोलण्यात चांगला होतो. आता कर्तव्याचा मार्ग मंत्रासारखा वाटतो, पण आता पंतप्रधानांनी केला असेल तर तो आम्हाला मान्य आहे, असे त्यांनी म्हंटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com