नारायण राणेंप्रमाणे उद्धव ठाकरेंना देखील अटक होणार? शंभूराज देसाईंचे संकेत
मुंबई : स्वतः च्या राज्यात दुष्काळी परिस्थिती असताना जो माणूस दुसऱ्या राज्यात प्रचाराला जातो असा माणूस राज्याचा कारभार करायाला नालायक आहे, असा घणाघात उध्दव ठाकरे यांनी केला होता. यावर आता शिंदे गटातून प्रतिक्रिया येत आहे. अशातच, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी उध्दव ठाकरेंवर कारवाईचे संकेत दिले आहे. यामुळे गुन्हा दाखल होवून उद्धव ठाकरेंना अटक देखील होवू शकते अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
शंभूराजे देसाई म्हणाले की, अशा पद्धतीचे शब्द प्रयोग कोण करत असेल तर त्यांना सहनही होत नाही सांगता येत नाही अशी त्यांची अवस्था झाली आहे. तुम्ही मुख्यमंत्री असताना कोकणात किती दिवसांनी त्या ठिकाणी गेलात ते आठवा उद्धव ठाकरे. मी लहान आहे आपल्यापेक्षा. ती भाषा शिंदे यांना वापरणे योग्य नाही, असेही त्यांनी म्हंटले आहे.
त्यांनी मुख्यमंत्र्यांबद्दल अपशब्द वापरला आहे. याबाबत मी त्यांच्या वक्तव्याची सीडी मागवली आहे. ही सीडी कायदेतज्ञांकडून तपासू आणि पुढील निर्णय घेवू. ते मुख्यमंत्री असताना नारायण राणे यांच्या बाबत त्यांनी काय केले होते हे सर्वांनी पाहिले होते, असेही शंभूराज देसाईंनी म्हणाले आहेत.
काय म्हणाले होते उध्दव ठाकरे?
महाराष्ट्रात सरकार असंविधानिक आहेच. मात्र, आज जे असंविधानिक आहेत ते स्वतःची घर सोडून फिरतायत. स्वतःच घर न सांभाळता दुसऱ्या राज्यात गेलेत. एक फुल दोन हाफ कुठे गेले माहिती नाही दुसरे डेंगू झाला होता, असे टीकास्त्र उध्दव ठाकरेंनी सोडले आहे. हवामान खात्याने इशारा देऊन देखील सरकारने काय केलं? महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची जबाबदारी कोण घेणार? मुख्यमंत्री, पंतप्रधान, मंत्र्यांना प्रचार करायला वेळ आहे मग माझ्या शेतकऱ्यांना बघायला वेळ आहे का? असा सवालही त्यांनी केला होता.