'प्रकाश आंबेडकर आणि सुषमा अंधारेंमुळे उद्धव ठाकरेंची प्रचंड ताकद वाढणार' रामदास कदमांच्या शुभेच्छा
सध्या राज्यात प्रचंड राजकीय गदारोळ सुरु आहे. त्यातच दुसरीकडे राजकीय मंडळींकडून एकमेकांवर जोरदार चिखलफेक करताना दिसत आहे. त्यातच आता शिवसेना(ठाकरे गट) आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या युतीची जोरदार चर्चा सुरु आहे. त्यावर आता अनेक राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येण्यास सुरूवात होत आहे. त्यावरच बोलताना आता शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केली आहे. प्रकाश आंबेडकर आणि सुषमा अंधारेंमुळे उद्धव ठाकरेंची प्रचंड ताकद वाढणार आहे. त्यांना माझ्या शुभेच्छा. अश्या शब्दात रामदास कदम यांनी ठाकरेंवर टीका केली.
प्रकाश आंबेडकर आणि सुषमा अंधारे यांच्यामुळे उद्धव ठाकरेंची ताकद प्रचंड वाढणार आहे. यामुळे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची खरी शिवसेना कुठे आहे? हे लोकं शोधत बसतील. आता खऱ्या अर्थानं उद्धव ठाकरे यांचं पितळ उघडं पडतंय, हे चांगलं आहे. त्यांना खूप शुभेच्छा. उद्धव ठाकरे यांना सध्या सुषमा अंधारे यांच्या पदराचा सहारा घ्यावा लागतो. उद्धव ठाकरे यांच्याकडे आता कुणीच राहिलं नाही, त्यामुळे जो येईल त्याला पक्षात घ्यायचं, हा एककलमी कार्यक्रम उद्धव ठाकरे यांनी सुरू केला. अशी टीका रामदास कदम यांनी केली.
रामदास कदम पुढे म्हणाले, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसनंतर आता प्रकाश आंबेडकर यांच्याशी ते युती करू पाहत आहेत. आता आणखी कुणी मिळतंय का? हे उद्धव ठाकरेंनी दिवा लावून शोधावे. जी अंधारेबाई हिंदू देवतांवर प्रचंड टीका करते. तिच्या पदराचा सहारा उद्धव ठाकरेंना घ्यावा लागतोय. वरती बाळासाहेब ठाकरेंच्या आत्म्याला काय वाटत असेल? याची पर्वा आणि जाणीवही त्यांना नाही. त्यांच्यासोबत आता कुणीही राहिलं नाही. त्यामुळे जो येईल त्याला सोबत घ्यायचं एवढाच त्यांचा एककलमी कार्यक्रम चालला आहे. असे देखील रामदास कदम यावेळी म्हणाले.