'हे बालिशपणाचं लक्षण' गुलाबराव पाटलांची राऊतांवर विखारी टीका
राज्यात सध्या प्रचंड राजकीय गोंधळ आहे सुरु आहे. तर दुसरीकडे शिंदे- फडणवीस सरकारचे पहिले हिवाळी अधिवेशन सुरु आहे. त्यातच या अधिवेशनादरम्यान, नागपूर एनआयटी भूखंड घोटाळ्यावरून मोठा गदारोळ पाहायला मिळाला. विरोधी पक्षातील नेत्यांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सातत्याने टीका केली जात आहे. त्यावरूनच शिवसेना (ठाकरे गट) नेते खासदार संजय राऊत यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. त्यालाच आता पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
नेमकं काय म्हणाले गुलाबराव पाटील?
जे काही आहे ते तुमच्यासमोर आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होऊन अवघे तीन ते चार महिने झाले आहेत. असं असताना मुख्यमंत्र्यांवर असे आरोप करणे, हे बालिशपणाचं लक्षण आहे. दिल्लीला जाणं हे मुख्यमंत्र्यांचं कामच असतं. केंद्रातून काही योजना किंवा पैसे आणायचे असतील, तर ते दिल्लीला जातात. योगायोगाने हे प्रकरणही एकाचवेळी आलं तर ते सारवासारव करायला गेले, असा आरोप करणं उचित नाही, असे पाटील यावेळी म्हणाले.
पुढे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी जळगाव शहरासह जिल्ह्यातील अनेक प्रश्नांची मांडणी केली होती. यावर ते म्हणाले की, आपल्याला पूर्ण वेळ मिळाला नाही. त्यामुळे खडसे यांनी मांडलेल्या विषयांना उत्तर देता आलं नाही, अशी खंत पाटील यांनी व्यक्त केली. आपल्याला आणखी जरा वेळ मिळाला असता तर आपण ‘विट का जवाब पत्थर से’ दिला असता, असंही गुलाबराव पाटील म्हणाले.