फडणवीस, तुमच्या मनात आलेच आहे तर विडा उचलाच : शिवसेना

फडणवीस, तुमच्या मनात आलेच आहे तर विडा उचलाच : शिवसेना

शिवसेनेने (ठाकरे गट) सामना संपादकीयमधून केले देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य

मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुमच्या मनात आलेच आहे तर कटुता संपविण्याचा विडा उचलाच! लागा कामाला, असे आवाहन शिवसेनेकडून (ठाकरे गट) सामना संपादकीयमधून केले आहे. शिवसेनेतून जे विष बाहेर पडलेय त्या विषाला ‘बासुंदी’चा दर्जा देण्याचा सध्या जो अचाट प्रयत्न सुरू आहे त्यामुळे कटुतेची धार कशी कमी होणार, असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे.

फडणवीस, तुमच्या मनात आलेच आहे तर विडा उचलाच : शिवसेना
शिंदे सरकारला धक्का: टाटा-एअरबसचा 22 हजार कोटींचा प्रकल्पही गुजरातला

महाराष्ट्राचे (उप) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऐन दिवाळीत सामोपचाराच्या, शहाणपणाच्या गोष्टी केल्या आहेत. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करावे तेवढे थोडेच. फडणवीस यांचा मूळ स्वभाव हा सामोपचाराने मिळून मिसळून वागण्याचाच होता. पण सत्ता गेल्यामुळे ते बिघडले. सत्ता येते व जाते. माणसाने मूळ स्वभाव बदलण्याची गरज नाही. फडणवीस यांच्यात नव्या सत्तांतरापासून प्रौढपणा आला असल्याचे जाणवू लागले आहे, असेही शिवसेनेने म्हंटले आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात कधी नव्हे एवढी कटुता आली आहे, हे नाकारता येणार नाही, असे फडणवीस यांनी कबूल केले. महाराष्ट्राच्या राजकारणात फक्त कटुता नव्हे तर सूडाच्या राजकारणाचे विषारी प्रवाह उसळत आहेत व या प्रवाहाचे मूळ भाजपच्या अलीकडच्या राजकारणात आहे. पण त्याबाबत फडणवीस यांच्यासारख्या नेत्यांना आता खंत वाटू लागली असेल तर त्या विषाचे अमृत करण्याचे कामही त्यांनाच करावे लागेल. फडणवीस यांनी त्यांच्या मनातील वेदना उघड केली आहे.

आज फक्त आपल्या महाराष्ट्रातच नाही तर देशाच्या राजकारणातच कटुता आली आहे. लोकशाहीचे संकेत काय आहेत? सत्ताधारी पक्ष कोणताही असो, त्याने विरोधी पक्षीय हे एकजात देशाचे शत्रू असल्याचे मानू नये. लोकशाहीत मतभिन्नतेला वाव असल्याने, भिन्न मत म्हणजे देशविरोधी मत असे ठरत नाही. म्हणून सत्ताधारी व विरोधी पक्ष यांनी एकमेकांच्या किमान प्रामाणिकपणावर विश्वास ठेवून काम केले पाहिजे. पण, आज हे वातावरण महाराष्ट्रात व देशातही राहिलेले नाही.

महाराष्ट्रात कटुता का व कोणी निर्माण केली? महाराष्ट्रात गेल्या अडीच वर्षात तीन सत्तांत्तरे झाली. त्यातील दोन सत्तांतरे थेट फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली झाली आहेत. अजित पवार यांच्या मदतीने फडणवीस व त्यांच्या पक्षाने सत्तांतर करण्याचा प्रयत्न केला. तो फसला. त्या वेळीही केंद्रीय सत्तेचा पुरेपूर गैरवापर केला गेला. हा प्रयोग यशस्वी झाला असता तर तो लोकमताचा कौल किंवा जनतेची किंवा परमेश्वराची इच्छा ठरली असती. पण महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी होताच हे घटनाबाहय़, लोकांचा पाठिंबा नसलेले सरकार असल्याचे सांगितले गेले. हा दुटप्पीपणा चांगला नाही. प्रामाणिकपणाने बोलत आहात तर त्यात गल्लत का करता, असा सवालही शिवसेनेने फडणवीसांना विचारला आहे.

महाराष्ट्रातील राजकारणात कटुता राहू नये व राज्याच्या कल्याणासाठी सगळय़ांनी एकत्र बसले पाहिजे हीच राज्याची परंपरा आहे. बेरजेचे राजकारण हीच महाराष्ट्राची परंपरा आहे. राजकारणात व्यक्तिगत चिखलफेक करताना कोणतेही धरबंध आता बाळगले जात नाहीत व त्यासाठी भाजपने काही भुंकणाऱ्या कुत्र्यांना प्रशिक्षण दिले आहे. ते शरद पवारांपासून, ठाकऱ्यांपर्यंत ज्या भाषेचा वापर करतात त्यामुळे राज्याच्या राजकारणातील कटुता कशी कमी होईल?

शिवसेना राहता कामा नये व शिवसेनेतून जे विष बाहेर पडलेय त्या विषाला ‘बासुंदी’चा दर्जा देण्याचा सध्या जो अचाट प्रयत्न सुरू आहे त्यामुळे कटुतेची धार कशी कमी होणार? शिवसेनेतले काही लोक लाचार किंवा मिंधे केल्याने सत्ता मिळाली; पण महाराष्ट्राचे राजकीय वातावरण साफ नसल्याची जाणीव फडणवीस यांना झाली हे काय कमी झाले? मुंबई महानगरपालिकेतून शिवसेना नष्ट करणे हा विचार महाराष्ट्रहिताचा नाही व शिवसेना नष्ट करण्यासाठी सर्व येरागबाळय़ांची मोट बांधणे हा काही प्रामाणिकपणा नाही, अशी टीकाही शिवसेनेने केली आहे.

खरी शिवसेना कोणती? हे फडणवीसांना पक्के माहीत आहे व त्यांनी गळय़ात जो ‘खरी शिवसेना’ म्हणून धोंडा बांधून घेतला आहे तो महाराष्ट्राला घेऊन बुडणार आहे, हे समजण्याइतके फडणवीस सुज्ञ आहेत. पण त्यांचे शहाणपण कोठेतरी भरकटल्यासारखे झाले आहे.

फडणवीस हे ‘सागर’ बंगल्यावर खूश आहेत. गेल्यावेळी भाजपने शब्द पाळला असता तर तेच आज ‘वर्षा’वर असते व आम्ही एका नात्याने त्यांच्याकडे फराळास गेलो असतो. असो. उद्या काय होईल असे जर-तर वगैरे राजकारणात चालत नाही. पण महाराष्ट्राची एकोप्याची परंपरा कायम राहावी या फडणवीसांच्या मताशी आम्ही सहमत आहोत. नेपोलियन, सिकंदरही कायम राहिले नाहीत. राम-कृष्णही आले आणि गेले. तेथे आपण कोण? फडणवीस, तुमच्या मनात आलेच आहे तर कटुता संपविण्याचा विडा उचलाच! लागा कामाला, असे आवाहन त्यांनी केले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com