बिनचेहऱ्याचं आणि बिनखात्याचे नामुष्की सरकार; सामनामधून शिवसेनेची टीका

बिनचेहऱ्याचं आणि बिनखात्याचे नामुष्की सरकार; सामनामधून शिवसेनेची टीका

शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला असला तरी अद्याप खातेवाटप झालेले नाही. यावरुन आता शिवसेनेने सामाना संपादकीयमधून शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे.

मुंबई : शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला असला तरी अद्याप खातेवाटप झालेले नाही. यावरुन विरोधकांनी आता शिंदे सरकारवर टीकेची राळ उठवली आहे. यावरुन आता शिवसेनेनेही सामाना संपादकीयमधून शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे. बिनचेहऱ्याचे आणि बिनखात्याचे असे ‘नामुष्की सरकार’ सहन करण्याची वेळ राज्यातील जनतेवर आली आहे, अशी टीका शिवसेनेने केली आहे.

बच्चू कडू यांच्या मंत्रीपदाचा पाळणा हलला असता तर त्यांना या ‘धोक्या’चा साक्षात्कार कदाचित झाला नसता; पण तसे झाले नाही आणि शिंदे-फडणवीस सरकारचे ‘कडू’ सत्य त्यांच्या तोंडातून बाहेर पडले. अर्थात असे अनेक दुःखी आणि ‘सुप्त ज्वालामुखी’ शिंदे-फडणवीस सरकारात आहेत आणि त्यांचे कधी स्फोट होतील याचा काहीच भरवसा नाही. त्यामुळेच मंत्रिमंडळ विस्तार होऊनही अद्याप खातेवाटप होऊ शकलेले नाही. ही नामुष्कीच आहे. मुळात हे सरकारच अशा अनेक सुप्त ज्वालामुखींच्या तोंडावर बसले आहे, असे शिवसेनेने म्हंटले आहे.

तीन दिवसांपूर्वी शिंदे-फडणवीस सरकार बिनमंत्र्यांचे होते. 40 दिवसांनंतर कसाबसा मंत्रिमंडळाचा पाळणा हलला. दोन्हीकडच्या ‘नाकीनऊ’ अशा एकूण 18 मंत्र्यांनी शपथ घेतली. मात्र, त्याला तीन दिवस उलटले तरी खातेवाटपाचे ‘बारसे’ होऊ शकलेले नाही. कारण हे सरकार ‘संधीसाधूं’चे आहे. ज्यांना मंत्रिमंडळात ‘संधी’ मिळाली ते ‘साधू’ बनल्याचे ढोंग करीत आहेत आणि मलईदार खात्यापासून हवा तसा बंगला मिळावा यासाठी रस्सीखेच करीत आहेत. त्यामुळे बिनचेहऱ्याचे आणि बिनखात्याचे असे ‘नामुष्की सरकार’ सहन करण्याची वेळ राज्यातील जनतेवर आली आहे, अशा शब्दात शिवसेनेने शिंदे सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com