राज ठाकरेंचा पत्रावर ठाकरे गटाची प्रतिक्रिया; म्हणाले, खऱ्या अर्थाने संस्कृती आणि परंपरा....
राज्यात सध्या प्रचंड गदारोळ सुरु आहे. त्यातच शिंदे गट आणि ठाकरे गट अंधेरी पूर्व पोटनिवडणूकीसाठी नवे नाव आणि चिन्हासह आक्रमक झाले. अशातच भाजप आणि शिंदे गट ठाकरे गटाला या निवडणुकीत मात देण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी करत आहे. त्याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहित भाजपने अंधेरीची निवडणूक लढवू नये, अशी मागणी केली आहे. त्यानंतर यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे नेते व खासदार विनायक राऊत यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.
काय म्हणाले राऊत?
राज ठाकरे यांचे आभार मानताना राऊत म्हणाले की, “राज ठाकरेंनी हा निर्णय घेतला त्याबद्दल त्यांचे मी आभार व्यक्त करतो. एखाद्या लोकप्रतिनिधीचे आकस्मित निधन झाले असेल आणि निधन झालेल्या लोकप्रतिनिधीच्या कुटुंबातल्या सदस्याकडून पोटनिवडणूक लढवत असेल, तर ती निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे. हीच आपली खऱ्या अर्थाने संस्कृती आणि पंरपरा राहिली आहे. मात्र दुर्दैवाने मागील काळात या परंपरेत खंड पडला. कोल्हापूरच्या पोटनिवडणुकीपासून आता अंधेरीच्या निवडणुकीपर्यंत ही पंरपरा खंडीत झाली”, अशी प्रतिक्रिया राऊत यांनी दिली आहे.
पुढे ते म्हणाले की, “देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे इतर बरेच पदाधिकारी हे जुने-जाणते नेतेमंडळी आहेत. यांच्या मनात कोणी संभ्रम निर्माण केला असेल आणि भाजपाने पोटनिवडणुकीत उमेदवार दिला असेल, तर ते बरोबर नाही. आम्ही आज जनतेत फिरत असतो, यावेळी लोकांमध्ये चीड असल्याचे दिसत आहे. या सर्वाचा विचार करता, राज ठाकरेंनी जे आवाहन केले, त्याला देवेंद्र फडणवीसांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.”, असे विधान देखील राऊत यांनी केले आहे.