आदित्य ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात; म्हणाले, गद्दार गॅंगवर...
राज्यात सध्या प्रचंड राजकीय गोंधळ सुरु आहे, त्यातच शिंदे गट आणि ठाकरे गटातील वाद दिवसांदिवस वाढतच चालला आहे. त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी वरळीतून निवडणूक लढवण्याची आव्हान दिले होते. या आव्हानांनंतर दोन्ही गटात चांगलाच वाद रंगला होता. त्यांनतर वरळीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभा घेतली. परंतु, सभेनंतर रिकाम्या खुर्च्यांचा फोटो, व्हिडीओ शेअर करत आदित्य ठाकरे व संजय राऊतांसह महाविकास आघाडीनं मुख्यमंत्र्यांसह शिंदेगटावर निशाणा साधला होता. त्यावरुनच आता पुन्हा एकदा आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदेंवर टीका केली आहे.
चिंचवड मतदारसंघात पोटनिवडणुकीतील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार नाना काटे यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीचा मेळावा पार पडला. आघाडीतील सर्वच नेत्यांनी यावेळी भाजप आणि शिंदे गटावर टीका केली. त्याच मेळाव्यात बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, ही पोटनिवडणूक म्हणजे काट्याची नाही,तर काटेंशी टक्कर आहे. तसेच राज्यातील गलिच्छ राजकारणाविरुद्धचा तो लढा आहे. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत की गुजरातचे असा प्रश्न उपस्थित करतानाच या गद्दार सरकारला महाराष्ट्राला पुढे न्यायचेच नाही आहे. तसेच या घटनाबाह्य गद्दार गॅंगवर उद्योजकांचा विश्वास न राहिल्याने ते बाहेर जात आहेत. हे उद्योग गुजरात व देशात इतरत्र गेल्याचे दुख नाही,तर राजकीय हेतूसाठी ते तिकडे पाठविले गेल्याचे दुख आहे. असे जोरदार टीकास्त्र आदित्य ठाकरेंनी यावेळी केली.
पुढे ते म्हणाले की, राजीनामे देऊन माझ्या वरळी, मुंबई येथील मतदारसंघातून आपल्याविरुद्ध लढण्याचे आव्हान मुख्यमंत्र्यांनी न स्वीकारल्याने आता त्यांनी त्यांच्या ठाण्यातील मतदारसंघातून आपल्याविरुद्ध निवडणूक लढवावी. यावेळी आम्ही खोक्याला हात लावला नाही, पण चाळीस आमदार आणि 13 खासदारांनी तो लावला नसल्याचे अजून सांगितलेले नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले. सभेतील गर्दीकडे बोट करीत आमच्या सभेला जनतेची गर्दी असते,तर घटनाबाह्य गद्दार मुख्यमंत्र्यांच्या सभेला ती खुर्च्यांची असते. असा टोलाही आदित्य ठाकरेंनी यावेळी मुख्यत्र्यांना लगावला.