अनिल परबांची मंत्री अब्दुल सत्तारांवर टीका; म्हणाले, भुखंड ढापणे, महिलांना...
राज्यात एकीकडे प्रचंड राजकीय घडामोडी घडत असताना, दुसरीकडे शिंदे- फडणवीस सरकारचे पहिले हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये पार पडत आहे. मात्र, या अधिवेशनात कृषीमंत्री अब्दुल सत्तार कथित गायरान घोटाळ्यावरून अडचणीत सापडले आहेत. त्यावरून आज अधिवेशनात प्रचंड गोंधळ झालेला पाहायला मिळाले. या विषयावर आक्रमक भूमिका घेत विरोधकांनी सत्तारांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यावरच आता शिवसेना (ठाकरे गट) नेते अनिल परब यांनी मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर निशाणा साधला आहे.
काय म्हणाले परब?
गायरान जमीन वाटपाच्या प्रकरणावर नागपूर खंडपीठाने अब्दुल सत्तार यांच्यावर ताशेरे ओढले. परंतु जेव्हा हा निर्णय महसुल राज्यमंत्री म्हणून सत्तारांनी घेतला होता, तेव्हा जिल्हाधिकाऱ्यांनी, उपसचिवांनी सांगून देखील त्यांनी ऐकले नाही. त्यांना जाताजाता फक्त वसुली करायची होती, ज्या पद्धतीने त्यांनी निर्णय घेतले त्याला जाताजाता फावडे मारणे म्हणतात. असं अनिल परब म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले की, या मंत्र्यांचे एकच काम होते भुखंड ढापणे, महिलांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करणे, आणि चारही बाजुंनी वसुली करणे. त्यामुळे त्यांना मंत्रीमंडळात राहण्याचा अधिकार नाही, त्यांचा तात्काळ राजीनामा घेतला पाहिजे. हा महत्वाचा विषय असल्यामुळे सगळे विषय बाजूला ठेवून ३५ च्या सूचनेनूसार सभागृहात चर्चा झाली पाहिजे, असे मत परब यांनी यावेळी मांडले.