शाईफेक प्रकरणाचे मी समर्थन करणार नाही, पण ज्याने शाईफेक केली, त्याचे मी अभिनंदन- चंद्रकांत खैरे
राज्यात सध्या प्रचंड राजकीय गदारोळ सुरु आहे. त्यातच राजकीय मंडळींकडून एकापाठोपाठ वादग्रस्त विधानांचे सत्र सुरु आहे. या दरम्यान, भाजप नेते मंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील महापुरुषांबद्दल वादग्रस्त विधान केले होते. त्यामुळे राज्यात एकच संताप व्यक्त केला जात होता. मात्र, पिंपरी-चिंचवड येथे शाईफेक करण्यात आली होती. त्यामुळे एकच गोंधळ निर्माण झाला. यावर राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया देखील येऊ लागल्या. याच पार्श्वभूमीवर आता शिवसेना ठाकरे गट नेते चंद्रकांत खैरे यांनी या विषयावर विधान केले आहे.
नेमकं काय म्हणाले खैरे?
चंद्रकांत पाटलांवर शाईफेक प्रकरणाचे मी समर्थन करणार नाही, पण ज्याने शाईफेक केली त्याने राग व्यक्त केला, त्याचे मी अभिनंदन करतो. कोणीही उठायचे आणि छत्रपती शिवाजी महाराज, महापुरूषांचा अपमान करायचा हे खपवून घेता येणार नाही. लोकांनी याबद्दलचा राग व्यक्त केलाच पाहिजे. असे खैरे माध्यमांशी बोलताना म्हणाले.
पुढे ते म्हणाले की, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह भाजपचे नेते वारंवार महापुरूषांचा अवमान करत आहेत. राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जे वादग्रस्त विधान केले, ते एकदा नाही तर दोनदा ते देखील याच शहरात.आता चंद्रकांत पाटलांनी देखील याच जिल्ह्यात येवून महात्मा ज्योतीबा फुले, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल त्यांनी भीक मागितल्याचे विधान केले. हा या शहराला आणि जिल्ह्याला बदनाम करण्याचा डाव आहे,असा आरोप देखील खैरे यांनी केला. राज्यपालांनी आता उडी मारून उत्तराखंडमध्ये निघून गेलं पाहिजे, असा सल्ला देखील खैर यांनी यावेळी दिला.