फडणवीसांनंतर राऊतांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले, राजकीय आदेश...
राज्यात सध्या प्रचंड राजकीय घडामोडी घडत आहे. त्यातच आज दिवसभर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या महाविकास आघाडीवरचे आरोप चांगलेच चर्चेत आले आहे. त्यानंतर यामुद्द्यावरून चर्चा होत असताना याच पार्श्वभूमीवर एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना शिवसेना ठाकरे गट नेते संजय राऊत यांनी देखील एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यात त्यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. देशाच्या गृहमंत्र्यांच्या आदेशावरून मला अटक केली गेली असा गौप्यस्फोट संजय राऊत यांनी केला आहे.
काय म्हणाले संजय राऊत?
महाराष्ट्रात सत्तांतर घडणार होतं, मला खोट्या प्रकरणात अटक केली. का अटक केली? शिंदे-फडणवीस सरकार बनत असताना अडथळे कुणाचे होऊ शकतात याची यादी काढली गेली. चार लोक दिल्लीत गेले ते आज सरकारमध्ये आहेत. तिथे सांगण्यात आले की संजय राऊतांचा बंदोबस्त करा. दुसऱ्या दिवशी माझ्याकडे छापा पडला आणि मला अटक झाली. आमचेही दिवस येतील पण आम्ही असं कधीही वागणार नाही. लक्षात घ्या गृहमंत्र्यांच्या आदेशाशिवाय मला अटक होऊच शकत नाही. जो देशातल्या संसदेचा २० वर्षे खासदार आहे त्याला अटक करायची असेल तर आदेश लागतोच ना? ईडीला राजकीय आदेश आला त्यामुळे अटक झाली. कारण हे सरकार स्थापन करायचं होते. असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला.
पुढे बोलताना त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपावर भाष्य केले ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांना अटक करण्याचा प्लान केला होता, टार्गेट दिलं गेलं होतं. हे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं ते खोटं आहे. त्या आरोपात काहीही तथ्य नाही. महाराष्ट्राची ही राजकीय परंपरा नाही. ही परंपरा गेल्या सात वर्षात सुरू झाली, आम्ही त्याचे बळी ठरलो. उद्धव ठाकरे हे सुसंस्कृत नेते आहेत. त्यांनी अशी काहीही भूमिका घेतली नाही. असे देखील राऊत यांनी यावेळी स्पष्ट केलं.