छत्रपतींच्या कार्यासोबत, घटनेसोबत साम्य असू शकते..मंत्री लोढांच्या वक्तव्यावर बच्चू कडूंचे विधान
राज्यात सध्या प्रचंड वादग्रस्त विधानांचे सत्र सुरु आहे. एक वाद शांत होत नाही तर दुसरा उफाळून येतो. आधी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्यानंतर आता आज भाजप नेते मंगलप्रभात लोढा यांनी देखील वादग्रस्त विधान केले आहे. छत्रपती शिवरायांच्या जीवनातील एका प्रसंगाची तुलना थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाशी केली आहे. या विधानामुळे प्रचंड वाद निर्माण झाला आहे. त्यावरच आता अनेक राजकीय लोकांची प्रतिक्रिया येत असताना त्यावरूनच शिंदे गट समर्थक आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
भाजप नेते मंगलप्रभात लोढा यांनी देखील वादग्रस्त विधानावर बोलताना बच्चू कडू म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातल्या आग्रा घटनेची आता तुलना नाही करता येणार. ते बरोबर सुद्धा नाही, कधी कधी चुकून शब्द निघतात. पण छत्रपतींच्या कार्यासोबत, घटनेसोबत साम्य असू शकते. पण आपण तुलना करु शकत नाही. एखाद्यावेळी चुकून शब्द निघतो. मग मीडिया तोडफोड करुन ते दाखवते, असा प्रकार आहे.” असे ते यावेळी म्हणाले.
काय म्हणाले होते मंगलप्रभात लोढा?
शिवप्रताप दिनी आज प्रतापगडावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाषणादरम्यान मंगल प्रभात लोढा म्हणाले की, औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराजांना डांबून ठेवले होते. पण, ते स्वराज्यासाठी बाहेर पडले. तसेच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना देखील कोणीतरी डांबून ठेवले होते. पण, महाराष्ट्रासाठी ते बाहेर पडले, असे त्यांनी म्हंटले आहे. मंगलप्रभात लोढांच्या या वक्तव्यावरूनआता राजकीय वर्तुळात त्यांच्या पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे.