मुली ज्याप्रकारे बॉयफ्रेंड बदलतात...; भाजप नेत्याची जीभ घसरली
इंदूर : नितीश कुमार यांच्या जेडीयू पक्षाने भाजपसोबत युती तोडत तेजस्वी यादव यांच्या आरजेडी पक्षासोबत सत्ता स्थापन केली. यावर टीका करताना भाजप नेते कैलास विजयवर्गीय यांची जीभ घसरली. मुली जसा बॉयफ्रेंड बदलतात, तसे नितीश कुमार यांनी नवा जोडीदार निवडला, अशी टीका त्यांनी केली आहे.
कैलास विजयवर्गीय म्हणाले की, मी परदेश दौर्यावर असताना मला एकाने सांगितले तिथल्या महिला कधीही बॉयफ्रेंड बदलतात. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचेही असेच आहे. ते कोणाचा हात कधी हातात घेतील आणि कोणाचा हात सोडतील हे समजणार नाही, अशा शब्दांत नितीश कुमार यांच्यावर त्यांनी टीकास्त्र सोडले.
कैलास विजयवर्गीय वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. यापूर्वी अग्निवीरांबाबत केलेल्या विधानामुळे ते चर्चेत होते. देशभरात लष्कराच्या पुनर्स्थापनेसाठी केंद्रीय धोरण असलेल्या अग्निपथच्या विरोधात सुरू असलेल्या निदर्शनांदरम्यान चार वर्षांनंतर सैन्यातून निवृत्त झालेल्या अग्निवीरांना भाजप कार्यालयात सुरक्षा रक्षक म्हणून नोकऱ्या देणार असल्याचे खळबळजनक विधान त्यांनी केले होते.
मात्र, नंतर विजयवर्गीय यांनी त्यावर स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले की, टूलकिट गँगच्या सदस्यांनी त्यांच्या विधानाचा विपर्यास केला आहे. अग्निपथ योजनेवरून सुरू असलेल्या गदारोळात भाजप नेत्याच्या या विधानावरून विरोधकांनी चांगलाच गोंधळ घातला होता.
दरम्यान, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मागील आठवड्यात भाजपपासून फारकत घेतली. व सात पक्षांच्या 'महागठबंधन'सोबत जाण्याचा निर्णय घेतला. याआधी आमदारांसोबतच्या बैठकीत नितीश कुमार यांनी केंद्रीय मंत्री अमित शहा जेडीयूमध्ये सतत फूट पाडण्याचे काम करत आहेत, असा आरोप केला होता.