नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचाही अंत होणार- प्रकाश आंबेडकर
राज्याच्या राजकारणात गदारोळ सुरु असताना आज राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. आज शिवसेना (ठाकरे गट) आणि वचिंत बहुजन आघाडी यांच्या युतीची घोषणा झाली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचा मुहूर्त साधून युती जाहीर करण्यात आली आहे. यावेळी दोन्ही पक्षाचा प्रमुखांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. याच पत्रकार परिषदेत बोलत असताना वंचित बहुजन आघाडी अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.
काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?
ईडीच्या मार्फत या देशातलं पॉलिटिकल लीडरशिप संपवण्याचं काम सुरु आहे. त्यांनी खरंच भ्रष्टाचार केला असेल तर केस करा, खटले दाखल करा आणि जेलमध्ये टाका. पण ते न करता लीडरशिपवर आक्षेप घेतला जातोय. हे आजच्या घडीला मोठं धोकादायक आहे. आपण कुणीही अमरपट्टा घेऊन आलेलो नाहीत. एक दिवस आपलाही अंत होणार आहे. तसा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचाही अंत होणार आहे. त्यांनी त्यांच्या पक्षातलीही लीडरशिप संपवली आहे. त्यांचे अनेक मंत्री सांगतात. आम्ही फक्त फायली उचलून घेतो. असे ते म्हणाले.
पुढे ते म्हणाले, क्राइसिसमध्ये राजकीय नेतृत्व विकसित होत असतं. आजच्या संकटात कुठेही राष्ट्रीय नेता दिसत नाही. ते नेतृत्व विकसित करण्यासाठी आम्ही संयुक्त प्रयत्न करणार आहोत. महाराष्ट्र तसेच राज्याबाहेरच्या पक्षांनाही आमची मदत आणि पाठिंबा राहील, असं आश्वासन देखील त्यांनी यावेळी बोलताना दिले.