महाराष्ट्राची तुलना पाकिस्तानशी करतात याचं आश्चर्य- देवेंद्र फडणवीस
राज्याच्या राजकारणात सध्या वेदांत प्रकल्पावरून जोरदार घमासान सुरु आहे. त्यावर युवासेना प्रमुख माजी मंत्री आदित्य ठाकरेंनी वेदांता प्रकल्प गुजरातला न्यायला महाराष्ट्र काय पाकिस्तान होता काय? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांना केला होता. त्यालाच आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे. सोबतच त्यांनी काँग्रेसवरही निशाणा साधला आहे.
देवेंद्र फडणवीस माध्यमांशी म्हणाले की, आदित्य ठाकरे महाराष्ट्राची तुलना पाकिस्तानशी करतात याचं मला आश्चर्य वाटतंय. एकदा कंगना राणावत असं काही बोलल्या होत्या. तेव्हा केवढा गजब झाला होता. आता आदित्य ठाकरे तीच भाषा बोलणार असतील तर मला आश्चर्य वाटतं, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरे यांना लगावला आहे.
केंद्र सरकारने आठ चित्ते भारतात आणले. त्यावर काँग्रेसने टीका केली होती. त्यावर उत्तर देताना ते म्हणाले की, काँग्रेस त्यांची जागा शोधत आहे. ते जनतेत नाहीत. संसदेत नाहीत. त्यांचं अस्तित्व संपुष्टात येत आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्टीवर टीका करण्याचं धोरणं त्यांनी अवलंबलं आहे. मला वाटतं देशातील लोकांनी चित्ते आणल्याचं स्वागत केलं आहे. मात्र, काँग्रेसकडे नकारात्मकता भरली आहे, असे जोरदार उत्तर काँग्रेसच्या टीकेला फडणवीस यांनी यावेळी दिले.
काय म्हणाले होते आदित्य ठाकरे?
वेदांता प्रकल्प गुजरातमध्ये पळवून न्यायला महाराष्ट्र हा काय पाकिस्तान होता का? राज्यात रोजगार येणार होता. तो हिरावून घेतला. आमच्या पोरांनी काय चूक केली? असा सवाल आदित्य ठाकरेंनी केला होता. तर माझ्यावर घरच्यांचे संस्कार आहेत. त्यामुळे मी काही बोलत नाही, असं सांगत आदित्य ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर बोलण्यास नकार दिला होता.