राष्ट्रवादीची भूमिका काय ते स्पष्ट झालं पाहिजे; यशोमती ठाकूर यांची मागणी
सूरज दहाट | अमरावती : अजित पवार आणि शरद पवार यांच्या गुप्त भेटीनं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. अशात, अजित पवार-शरद पवार या काका पुतण्यांच्या भेटीनं महाविकास आघाडीत अस्वस्थता निर्माण झाली आहे. यावर कॉंग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादीची काय भूमिका आहे ते स्पष्ट झालं पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
राष्ट्रवादीची काय भूमिका आहे ते स्पष्ट झालं पाहिजे. कोण कोणासोबत आहे हेही स्पष्ट झालं पाहिजे. काका पुतण्या भेटीने महाविकास आघाडीत अस्वस्थता नाही, असे यशोमती ठाकूर यांनी म्हंटले आहे. तर, काँग्रेस व ठाकरे गट ठाम आहे, असं मत ठाकूर यांनी मांडलं आहे.
तर, नाना पटोले म्हणाले की, आमच्या मित्र पक्षांमध्ये काय सुरू आहे याकडे लक्ष देण्याची आमची भूमिका नाही. भाजपाच्या विरोधात जे लढायला तयार असतील, त्यांना आम्ही बरोबर घेऊन जाऊ. शरद पवारांबाबत मनात शंका असण्याचं कारण नाही. त्यामुळे त्यांच्या व्यक्तिगत आणि पक्षात काय घडामोडी घडतायेत त्याकडे लक्ष देण्याचा आम्हाला कारण नाही, असे त्यांनी स्पष्ट केले होते.
दरम्यान, काका-पुतण्यांच्या भेटीगाठींनी उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेस नेत्यांमध्ये चलबिचल वाढली आहे. अजित पवार फुटल्यानंतर शरद पवार गटाकडून अजित पवारांचा कोणत्याही प्रकारचा निषेध केला नव्हता. शिवाय अजित पवार आणि त्यांच्यासोबत गेलेल्या नेत्यांचा निषेधही झालेला दिसला नाही. अजित पवार सत्ताधाऱ्यांच्या सोबत तर शरद पवार विरोधांसोबत असल्यानं काका-पुतणे दोन्ही दगडांवर पाय ठेऊन आहेत का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.