thane shivsena | Eknath Shinde
thane shivsena | Eknath ShindeTeam lokshahi

LIVE: CM एकनाथ शिंदे ठाण्यात दाखल; मुसळधार पावसात झालं स्वागत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde Government) यांच्या नव्या सरकारची आज सकाळी 11 वाजता बहुमत चाचणी होणार आहे. काल विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळाल्यानंतर शिंदे सरकारची आज महत्वाची परीक्षा आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde Government) यांच्या नव्या सरकारची आज सकाळी 11 वाजता बहुमत चाचणी होणार आहे. काल विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळाल्यानंतर शिंदे सरकारची आज महत्वाची परीक्षा आहे. या परीक्षेपुर्वीच शिंदे सरकारने उद्धव ठाकरे गटाला हादरे दिले. विधिमंडळ सचिवालयाने शिवसेना गटनेतेपदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तर प्रतोदपदी भरत गोगावले यांचीच नियुक्ती वैध ठरवली.

एकनाथ शिंदेंचं ठाण्यात जोरदार स्वागत

एकनाथ शिंदे यांनी काल मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. भाजपसोबत सरकार स्थापन केल्यानंतर आज ते पहिल्यांदा ठाण्यामध्ये दाखल झाले आहेत. बंड केल्यानंतर राज्याबाहेर गेलेले एकनाथ शिंदे आज मुख्यमंत्री होऊन ठाण्यात दाखल झाल्यानंतर त्यांचं मोठ्या उत्साहात समर्थकांकडून स्वागत करण्यात आलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन 

मुंबई- बहुमत चाचणीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे संध्याकाळी हुतात्मा चौकात पोहचले आहेत. संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील हुतात्म्यांना त्यांनी अभिवादन केले आहे.

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांचं जंगी स्वागत 

विधान भवनातून बाहेर पडता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचा भव्य हार घालून सत्कार करण्यात आलाय. यावेळी त्यांच्या स्वागताला कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.

मी आणि देवेंद्र फडणवीस मिळून 200 आमदार निवडणून आणू - CM शिंदे

महाविकास आघाडी सरकारमध्ये आमचा श्वास कोंडत होता, मोकळा श्वास घेण्यासाठी, बाळासाहेबांचा विचार घेऊन आम्ही भाजपसोबत आलो आहोत असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. आता सध्या आम्ही ४० लोक झालो असून, यामध्ये आणखी वाढ होईल. आगामी निवडणुकीत आम्ही दोघे मिळून तब्बल २०० आमदार निवडून आणू असं एकनाथ शिंदे म्हणाले.

विरोधीपक्ष नेत्याची जबाबदारी फार महत्त्वाची असते - अजित पवार 

विधीमंडळात विरोधीपक्ष नेते पदही महत्त्वाचं असते. महाराष्ट्र चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेलं आहे, कुठे कधी काय घडेल सांगता येत नाही, सध्या पावसाने ओढ दिलीये, दुबार पेरणी आपल्याला करावी, लागेल की काय असा शेतकरी वर्गावर प्रसंग, धरणाचे पाणीसाठे कमी झाले आहेत, ठाण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या बार्वी धरणातही पाणी कमी आहे, कुठल्याही भागामध्ये, कुठल्याही स्तरावर काम करत असताना सर्वांना असं वाटतं की आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, ते त्यावेळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री नेत्यांकडे जात असतात, त्यांना तिथे न्याय मिळाला नाही तर ते विरोधीपक्ष नेत्याकडे येतात,त्यामुळे ती जबाबदारी फार महत्त्वाची असते,

विरोधीपक्ष नेता म्हणून निवड, अजित पवारांकडून आभार 

माझी आज विरोधीपक्ष नेतेपदी निवड झाल्याबद्दल माझं कौतुक केलं, शुभेच्छा दिल्या, राज्यातील सर्वोच्च कायदेमंडळ असणाऱ्या महाराष्ट्र विधानसभेच्या विरोधीपक्ष नेतेपदी माझी निवड केल्याबद्दल सर्व विरोधी पक्ष सदस्यांचे आभार मानतो, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे आभार, तुम्ही माझी निवड केली, मी ही जबाबदारी स्वीकारली आहे.

महाविकास आघाडीत जाऊन शिवसैनिकांना काहीच मिळालं नाही - शिंदे

महाविकास आघाडीसोबत जाऊन शिवसैनिकांना काहीच मिळालं नाही. अनेकजण माझ्याकडे येऊन ओक्साबोक्षी रडले. मी रात्री उशिरापर्यंत बसलेलो असायचो, लोक माझ्याकडे तक्रारी करायचे. शिवसैनिकांनी फायदा झाला पाहिजे होता, कारण शिवसेनेचा मुख्यमंत्री होता. त्यामुळे मी सांगू इच्छितो की शिवसैनिकांच्या आयुष्यात अमुलाग्र बदल झाल्याशिवाय राहणार नाही, हे सरकार युतीचं आहे असं शिंदे म्हणाले.

"अजित पवार काम करतात, मला त्यांचा स्वभाव आवडतो"

एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितलं की, अजित दादांची अन् माझी अंडरस्टॅंडींग होतं. ते माझ्या मंत्रालयाच्या सुद्धा बैठका घेतल्या, मी त्यांना कधी बोललो नाही. कारण तो माणूस काम करत होता असं म्हणत एकनाथ शिंदेंनी अजित पवारांचं कौतूक केलं. माझ्या खात्यात सगळे हस्तक्षेप करायचे, माझ्यापेक्षा वरीष्ठ असल्यानं मी बोलू शकत नव्हतो असं एकनाथ शिंदे म्हणाले.

उद्धव ठाकरेंशी बोलण्याचा प्रयत्न केला मात्र पाच वेळा अपयश आलं - एकनाथ शिंदे

आमच्यावर गद्दारीचा शिक्का लावू नका, आम्ही गद्दार नाही. सुरुवातीला मला मुख्यमंत्री करणार होते. अजित दादांनी सांगितलं की, आमचाही विरोध नव्हता, तुमच्या पक्षाचाच त्या पदासाठी तुम्हाला विरोध होता. मी त्यानंतर पदाचा मोह सोडला आणि उद्धव साहेबांना म्हटलं तुम्ही पुढे चला आम्ही सोबत आहोत. आम्ही सत्तेसाठी नाही आलो, नाही तर एवढे मंत्री सत्ता सोडून आले नाही असं शिंदे म्हणाले. निवडून आलेल्या आमदारांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे, ते अनेकदा मला सांगायचे, आपली नैसर्गिक युती भाजपसोबत आहे. ते सर्व आमदार माझ्याकडे तक्रारी करायचे, त्यानतंर मी पाच वेळा मी उद्धव ठाकरेंकडे बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र पाचही वेळा आम्हाला अपयश आलं असं शिंदे म्हणाले.

आजपर्यंत शिवसेनेसाठी संघर्ष केला, कुटुंबाला सोडून पक्षाला वेळ दिला - एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे यांनी आपल्या आजपर्यंतच्या कारकिर्दीबद्दल सभागृहाला माहिती दिली. आपण आजपर्यंत आंदोलनं केली, निदर्शनं केली, वेगवेगळ्या प्रश्नांवरुन संघर्ष केला. शिवसेनेसाठी मी माझं आयुष्य खर्च केलं असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी माझा हा संघर्ष जवळून पाहिलं आहे. दिघे साहेब गेल्यानंतर सर्वांना वाटलं की शिवसेना ठाण्यातून संपून जाईल, मात्र मी दिघे साहेबांच्या पुण्याईमुळेआजही नगरपंचायती, नगरपरिषदा, महानगर पालिका सगळीकडेच शिवसेनेची सत्ता आहे.

आम्ही बंड नाही, उठाव केला: गुलाबराव पाटील

आम्ही बंड केलेला नाही उठाव केला आहे. आज माझ्या सारख्या माणसाला म्हणतात गुलाबराव तुम्हाला टपरीवर पाठवीन. रिक्षा चालवणारा, चहा विकणारा ज्यांना काही काम नव्हतं त्यांना नेता केलं. आता जे शिवसेना सोडून जातात ते पुन्हा निवडून येत नाही असे दादा म्हणाले. पण दादा आम्ही शिवसेना सोडली नाही त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. आमचा साधा मेंबर जरी फुटतो तेव्हा आम्ही विचार करतो. चाळीस आमदार फुटले ही आजची आग नाही, अशा शब्दांत एकनाथ शिंदेंनी आपली बंडाबद्दलची भावना बोलून दाखवली आहे.

Ashok Chavhan : 'वेगळा अर्थ काढू नका, थोडासा लेट झाला', बहुमत चाचणीला मुकल्याचं स्पष्टीकरण 

बहुमत चाचणीला अशोक चव्हाणांची गैरहजेरी, सभागृहाचे दरवाजे बंद झाल्यानं बहुमत चाचणीला मुकले, थोडासा उशीर झाल्यानं बहुमत चाचणीला अशोक चव्हाण मुकले, अखेरच्या क्षणी सभागृहात जाताना उशीर झाल्यानं बहुमत चाचणीला मुकल्याचं स्पष्टीकरण, मुद्दामून बहुमत चाचणी टाळलेली नाही, अशोक चव्हाण यांचं स्पष्टीकरण, वेगळा अर्थ काढू नका, अशोक चव्हाण यांचं आवाहन

जे पळाले, त्यांना शिवसेना संपवायची होती - आदित्य ठाकरे यांचा निशाणा 

कुर्ल्यातील इमारत दुर्घटनेनंतर मी गेलो होतो रात्री अडीच वाजता, पण तिथले स्थानिक आमदार गुवाहाटीत पार्टी करत होते, मतदारांना बंडखोर आमदारांना कधी तरी तोंड द्यावं लागेलच, आदित्य ठाकरेंचा इशारा

गेल्या अडीच वर्षात मंत्रालयात नोटा छपाईचा कारखाना सुरु झाला - सुधीर मुनगंटीवार

गेल्या अडीच वर्षात मंत्रालयात नोटा छपाईचा कारखाना सुरु झाला, नाना भाऊ खरं बोला, मनातून सांगा, प्रमोशनच्या फाईलवर लक्ष नाही गेलं, पण मोहाच्या फुलाच्या दारुला देशीचं विदेशी केलं, तुम्ही रोजगार हमी योजनेची मजुरी दिली नाही. वन्य प्राण्याच्या हल्ल्यात एखादा कष्टकरी मृत झाला तर मदत बंद केली, १६१ आमदार शिवसेना भाजपचे निवडून आले, एकनाथ शिंदे तुम्हाला खरा सॅल्यूट, हा सॅल्यूट यासाठी की ते सत्तेत होते, आठ मंत्री सोबत आहेत, भगवा हाती घेतला होता, एक त्याग हा देवेंद्र फडणवीस यांचाही आहे, हा इतिहास होईल, जयंत पाटील तुमच्या नेत्याचा इतिहास पाहा, १९९९ ला स्वतःचा पक्ष काढला, अजित दादांनी काय केलं ते पाहा, आमदारांना भीती दाखवताय, आता तुम्ही स्वतःची चिंता करा, इथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत...

भास्कर जाधव भाजपावर संतापले

एकनाथ शिंदे आज मुख्यमंत्री झाले. गेल्या आठ दिवसात मी झोपलेलो नाही. शिंदे साहेब माझे जवळचे मित्र आहेत. मी कधी असा विचलीत होत नाही. पण मी माझा चेहरा लपवू शकत नाही. एकनाथराव शिंदे आजही सांगत आहेत, मी शिवसेनेचा आहे. मी हिंदुहृदयसम्राट यांचा शिवसैनिक आहे. आनंद दिघे यांचा वारसदार आहे. मीही हे मान्य करतो. मला त्यांना सांगायचंय, की.. तुम्ही शिवसेनेचं नाव घेता.

सत्तेच्या खेळात सामान्य माणसाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष, बाळासाहेब थोरात यांचा राजकीय नाट्यावर विधानसभेतून निशाणा 

महाराष्ट्रात जुलैचा पहिला आठवडा सुरुय, महाराष्ट्रात पेरणीची अवस्था काय? पाऊस नाही, पेरण्या नाही, दुबार पेरणीची वेळ आली आहे, कर्जाची व्यवस्था नाही, या सगळ्या सत्तेच्या खेळात सामान्य माणसाच्या प्रश्नाकडे तुमचं दुर्लक्ष झालंय, बाळासाहेब थोरात यांचा निशाणा साधला आहे.

चांगलं कामच तुम्हाला अडचणीत आणतंय! बाळासाहेब थोरातांच्या फडणवीसांना कानपिचक्या 

काँग्रेसच्या बाळासाहेब थोरात यांच्याकडून एकनाथ शिंदेच्या अभिनंदनाच्या भाषणाला सुरुवात, सतत गर्दीत राहणारं व्यक्तिमत्त्व तुमचं आहे, तुमचं भरपूर कौतुक करण्यात करण्यात आले. चांगलं कामच तुम्हाला अडचणीत आणतंय, बाळासाहेब थोरात यांचा फडणवीसांना टोला लगावला आहे.

'शहाजी भोसले, अब्दुल सत्तार, शिंदे, फडणवीस...' अजितपवारांनी भाषणात 4 जणांना सुनावलं 

तिसावे मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारली शिवसैनिक सारखं का सांगावं लागत? याचे आत्मचिंतन झालं पाहिजे असं मत अजित पवार यांनी व्यक्त केले आहे. ते भाजपा शिंदे सरकारच्या विश्वासदर्शक ठरावानंतर सभागृहातील भाषणादरम्यान बोलत होते.

बदला मी घेणार नाही- फडणवीस

ज्यांनी टिंगल केली, अपमान केला, त्यांचा मी बदला घेणार नाही. सत्ता येते आणि जाते, त्याचा अहंकार येता कामा नये. आमचं सरकार कोणत्याही बदल्याच्या भावनेनं काम करणार नाही. मागच्या सरकारचे जे चांगले निर्णय आहेत ते पुढे कायम करु. निवडून येतो, त्याला परत पाच वर्षानंतर परिक्षा द्यावीच लागते. कोणीही असो प्रत्येकानं हे लक्षात ठेवावं.

'शिवसेना-भाजप युतीचा विजय असो' घोषणांनी सभागृह दणाणले

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदनाच्या प्रस्तावावर बोलताना आमदारांनी शिवसेना-भाजप युतीचा विजय असो घोषणांनी सभागृह दणाणून सोडले.

शिवसेनेच्या व्हीपविरोधात शिंदे गटाचे मतदान

शिवसेनेने व्हीप बजावला असूनही शिंदे गटाने विरोधात मतदान केले. याची नोंद पटलावर घेतली असल्याचे विधानसभा अध्यक्षांनी सांगितले.

महविकास आघाडीला 99 मते 

महाविकास आघाडीला 99 जणांनी मतदान केले आहे. तर, तीन जण तटस्थ म्हणून मतदान केले.

कैलास गोरंटयाल यांचे 'अब तक छप्पन' म्हणत शिंदे सरकार विरोधात मतदान  

कैलास गोरंटयाल यांनी अब तक छप्पन म्हणत शिंदे सरकार विरोधात मतदान केले आहे. नंबर घेण्याआधी त्यांनी 'अरे शेर बोला तो ईडी लग जायेंगी' अशी डायलॉगबाजीही केली.

शिंदे सरकारने बहुमत चाचणी जिंकली

शिंदे गटाची आज विधानसभेत अग्निपरीक्षा झाली. एकनाथ शिंदे सरकारने बहुमत चाचणी तब्बल 164 मतांनी जिंकली. शिवसेनेचे आणखी एक आमदार संतोष बांगर यांनीही बंड पुकारल्याने शिंदे गटाचे बळ वाढले.

आदित्य ठाकरे शेवटच्या क्षणी पोहचले सभागृहात

सभागृहाचे कामकाज सुरु होण्याची वेळ होऊनही आदित्य ठाकरे न आल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. अखेर शेवटच्या क्षणी आदित्य सभागृहात पोहचले

प्रताप सरनाईकांच्या मतदानावेळी ईडी ईडी घोषणा

प्रताप सरनाईक मतदानास उभे राहताच विरोधकांमधून "ईडी ईडी" म्हणून घोषणाबाजी करण्यात आली. तर, सरनाईक यांनी थोड्याच वेळात उत्तर देणार असे प्रत्युत्तर दिले.

 विश्वासदर्शक ठराव मांडला

सुधीर मुनगटीवार यांनी विश्वासदर्शक ठराव मांडला आहे. भरत गोगवले यांनी त्याला अनुमोदन दिले.

अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात शिवसेना सुप्रीम कोर्टात

विधासभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटास मान्यता दिली. अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात शिवसेनेने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली. परंतु या याचिकेवर तातडीने सुनावणीस न्यायालयाने नकार दिला. न्यायालयाने 11 जुलै रोजीच या याचिकेवर सुनावणी ठेवली आहे.

उद्धव ठाकरेंना पुन्हा धक्का

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना धक्क्यांवर धक्के बसत आहे. सरकार गेल्यानंतर आता पक्षही जाण्याच्या तयारीत आहे.

शिवसेना फुट पडली असतांना आमदार संतोष बांगर यांनी भावनिक भाषण केले होते. त्याशिवाय, त्यांनी आपल्या जिल्ह्यात बंडखोरांविरोधात जाहीर भूमिकाही घेतांना त्यांना रडूही कोसळले होते. आता ते शिंदे गटात दाखल झाले आहे. बांगर यांनी घेतलेल्या यु-टर्नमुळे शिवसेनेला धक्का बसला आहे.

विधीमंडळ अधिवेशनाचा आज दुसरा दिवस

विधीमंडळाच्या अधिवेशाच्या दुसऱ्या दिवसाच्या कामकाजाला ११ वाजता सुरूवात होईल. यासाठी सर्वपक्षीय नेते विधान भवनात पोहोचण्यास सुरूवात झाली आहे.

पवार जे बोलतात त्याचं नेमकं उलट होतं- प्रवीण दरेकर

शरद पवारांनी येत्या सहा महिन्यात राज्यात मध्यावधी निवडणुका लागतील असं भाकित केल्यानंतर भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी शरद पवार जे बोलतात त्याचं नेमकं उलट होत असतं हा इतिहास आहे. त्यामुळे हे सरकार पुढील १० वर्ष राहील, असं म्हणाले.

घाईघाईत नामांतराचा प्रस्ताव

राज्य सरकार हे जाणार असल्याचे कळताच औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर करण्याचा प्रस्ताव जो आहे तो घाईघाईने घेतला असल्याची प्रतिक्रिया केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी दिली, मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देत असताना घेतलेला निर्णय म्हणजे हा उशिरा सुचलेले शहाणपण असल्याची देखील जोरदार टीका केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली.

अजित पवार विधान भवनात दाखल

राष्ट्रवादी काँग्रेसच्या रविवारी संध्याकाळी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये झालेल्या बैठकीत आमदारांकडून अजित पवार यांना विधानसभा विरोधी पक्ष नेते पद देण्याची मागणी करण्यात आली आहे. अजित पवार आता विधान भवनात दाखल झाले आहे.

सरकारची रणनीतीवर चर्चा

बहुमत चाचणीच्या रणनीतीविषयी शिंदे गट आणि भाजपाची बैठक झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संवाद साधला. आज सरकारची रणनीती काय असेल यावर प्रामुख्याने चर्चा करण्यात आली, असं ट्वीट करत एकनाथ शिंदेंनी ही माहिती दिली आहे.

संदीप देशपांडे यांचा ठाकरेंवर निशाणा

ट्वीट करत संदीप देशपांडे यांचा आदित्य आणि उद्धव ठाकरे पितापुत्रांना टोला लगावला. व्यंगचित्र पोस्ट करत संदीप देशपांडेंचा फुटलेल्या शिवसेनेवरुन हल्लाबोल केला. व्यंगचित्रात आदित्य उद्धव यांना म्हणतो की, बाबा, एक आयडीआय सुचलीय. आपण शिवसैनिकांना शिवबंधन व प्रतिज्ञापत्राऐवजी त्यांना जीपीएस ट्रॅकरच बांधूया

 पवार म्हणतात, शिंदे सरकार सहा महिन्यांत कोसळेल

राज्यात एकनाथ शिंदे यांचे सरकाराचा शपथविधी होऊन चार दिवस झाले नसतांना राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी मोठे भाकीत केले आहे. शिंदे सरकार फक्त सहा महिन्यांत कोसळेल, मध्यवधी निवडणुकीसाठी तयार राहा, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com