Mumbai Local : 'तिकीट काढा अन् 50 हजार रुपये जिंका', प्रवाशांसाठी अनोखा उपक्रम
सध्या संपूर्ण देश डिजिटल युगाकडे वाटचाल करत आहे. पैशाच्या व्यवहारांपासून, बस- रेल्वेच्या तिकीटापर्यंत सगळंच काही डिजिटल स्वरूपात उपलब्ध होत आहे. मात्र तिकीट डिजिटल झाले तरीही लोकल प्रवासी मात्र तिकीट काढण्याची तसदी घेत नाहीत. अशातच आता लोकल प्रवाशांसाठी भारतीय रेल्वेने एक हटके पाऊल उचलले आहे.
'तिकीट काढा आणि लॉटरी जिंका' असा एक उपक्रम सुरु करण्यात आला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, रेल्वेने विनाटिकीत प्रवास करणाऱ्यांमुळे भारतीय रेल्वेला मोठ्या प्रमाणात भुर्दंड सहन करावा लागत आहे. यावर आता रेल्वेने चांगलीच शक्कल लढवली आहे. भारतीय रेल्वेने तिकीट खरेदी करणाऱ्यासाठी 'लकी यात्रा' नावाने योजना सुरु केली आहे. याअंतर्गत, तिकीट-पास धारकांसाठी आठ आठवड्यांसाठी ही विशेष योजना तयार करण्यात आली आहे. एफसीबी इंटरफेस कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड या योजनेत सहभागी आहे आणि भाग्यवान प्रवाशांना बक्षीस रक्कम वितरित करेल. मुंबई लोकल प्रवाशांमध्ये तिकिटे खरेदी करून प्रवास करण्याची सवय लावण्यासाठी आणि शिस्तबद्ध प्रवाशांचे आभार मानण्यासाठी ही योजना एक विशेष उपक्रम म्हणून तयार करण्यात आली आहे.
या योजनेचा लाभ कोणासाठी ?
या योजनेअंतर्गत, मासिक, त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिक पाससह सर्व प्रकारची तिकिटे वैध मानली जातील. ही योजना सर्व श्रेणीतील प्रवाशांसाठी खुली आहे. या विशेष उपक्रमांतर्गत रेल्वे प्रवाशांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. ही संपूर्ण योजना एका खाजगी संस्थेद्वारे प्रायोजित आहे. बक्षीसाची रक्कम एका खाजगी संस्थेकडून दिली जाईल.
प्रवाशांनी रेल्वे तिकिटे घेऊन प्रवास करावा. यासाठी प्रवाशांकडे तिकिटे खरेदी करण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. यामध्ये तिकीट खिडकी, एटीव्हीएम, मोबाईल तिकीट, ऑनलाइन तिकीट आणि स्मार्ट कार्ड यांचा समावेश आहे.