Police Recruitment : पोलिस भरतीची स्वप्ने पाहणाऱ्या उमेदवारांसाठी खुशखबर! आता होणार 'इतक्या' पदाची भरती
Police Recruitment : गेल्या अनेक दिवसांपासून उमेदवार पोलिस भरतीची वाट पाहत होते.तयारीसाठी अनेकांनी सराव सुरु ठेवला होता, मात्र सरकारकडून अधिकृत घोषणा होत नसल्याने उमेदवारांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते.अखेर गृहविभागाने सुमारे 15,000 पदांच्या भरतीस मान्यता दिल्याने उमेदवारांच्या आशा पुन्हा जागृत झाल्या आहेत.
मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार या भरतीची संपूर्ण प्रक्रिया लवकरच जाहीर होणार असून अर्ज करण्याची तारीख,परीक्षा व शारीरिक चाचणीचे वेळापत्रक निकट भविष्यात प्रसिद्ध केले जाईल. महापालिकांच्या निवडणुकांपूर्वी ही भरती प्रक्रिया पार पडेल, अशी चर्चा आहे. मोठ्या प्रमाणावर अर्ज येण्याची शक्यता असून लाखोंच्या घरात उमेदवार या प्रक्रियेत सहभागी होतील असा अंदाज आहे.
मंत्रिमंडळ बैठकीत पोलिस भरतीव्यतिरिक्त आणखी काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. राज्यातील रास्त भाव दुकानदारांच्या मार्जिनमध्ये वाढ, सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्य वितरणातील सुधारणा, तसेच सोलापूर–पुणे–मुंबई हवाई प्रवासाकरिता निधी मंजूर करण्यात आला. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या विविध कर्ज योजनांमधील जामीनदार अटी शिथिल करण्यात आल्या असून शासन हमीची मुदतवाढ पाच वर्षांसाठी देण्यात आली आहे.
दरम्यान, रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा अद्याप सुटलेला नसताना १५ ऑगस्टला मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजवंदन होणार असल्याने भरत गोगावले नाराज झाले आहेत. त्यांनी मंत्रिमंडळ बैठकीला अनुपस्थिती दर्शवली असून दिल्लीकडे रवाना झाले. मुख्यमंत्री हे श्रीनगर दौऱ्यावर असल्याने त्यांनी बैठकीत व्हिडिओच्या माध्यमातून सहभाग घेतला. पोलिस भरतीच्या निर्णयामुळे राज्यातील तरुणांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. लवकरच जाहीर होणाऱ्या भरती प्रक्रियेच्या तपशीलाची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत.