"कायदेशीर मार्गांनी हा विषय लढवू...", अलमट्टी धरणाची ऊंची वाढवण्यावरुन प्रकाश आबिटकर यांचे वक्तव्य
सध्या अलमट्टी धरणाची ऊंची वाढवण्यावरुन मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे. अलमट्टी धरणाच्या उंची वाढीबाबत महाराष्ट्र सरकारने आपली स्पष्ट भूमिका मांडली असून, कर्नाटक सरकारकडून यासाठी कायदेशीर पातळीवर प्रयत्न सुरू असल्यास, महाराष्ट्रही तशीच तयारी करत असल्याचे जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी स्पष्ट केले. शनिवारी पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की, “अलमट्टी धरणाच्या उंची वाढीला आमचा ठाम विरोध आहे. कर्नाटक सरकारने वकील व जलतज्ज्ञांची मदत घेतल्यास, आम्हीही तशीच टीम उभी करू. कायदेशीर मार्गांनी हा विषय लढवू.”
ते पुढे म्हणाले की, “महात्मा फुले जनआरोग्य योजनेत काही महत्त्वाचे बदल लागू झाले आहेत. या योजनेअंतर्गत रुग्णांकडून पैसे घेण्यास बंदी असताना, काही रुग्णालयांकडून पैसे घेतल्याच्या तक्रारी आल्या आहेत. अशा प्रकरणांवर कारवाईचे निर्देश देण्यात आले असून, आरोग्य विभागाच्या संकेतस्थळावरून ऑनलाइन तक्रार करता येणार आहे.”
‘लाडकी बहीण’ योजनेच्या अंमलबजावणीमुळे इतर खात्यांना निधी वाटप करताना अडचणी येत असल्याचेही त्यांनी नमूद केले. “सुरुवातीला काही अडचणी आल्या, पण येत्या टप्प्यात सर्व योजनांसाठी आवश्यक निधीची तरतूद केली जाईल,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
कायमच का चर्चेत आहे हे धरण?
अलमट्टी धरण हे कृष्णा नदीवरील एक महत्त्वाचे धरण असून, त्याच्या उंची वाढीचा प्रस्ताव वारंवार चर्चेत येतो. कर्नाटक सरकार या उंची वाढीच्या माध्यमातून अधिक पाणी साठवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र त्यामुळे महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगलीसारख्या भागांना मिळणाऱ्या पाण्याचा हिस्सा कमी होण्याची भीती आहे. याच कारणामुळे महाराष्ट्र सरकार या प्रस्तावाला तीव्र विरोध करत असून, न्यायालयीन लढाईचाही विचार केला जातो. जलवाटपाच्या या वादामुळे अलमट्टी धरण हे नेहमीच राजकीय आणि सामाजिक चर्चेच्या केंद्रस्थानी राहते.